ठाणे : चार दिवसातील दुसरी घटना; चिमुरडीच्या हत्येने भिवंडी पुन्हा हादरली | पुढारी

ठाणे : चार दिवसातील दुसरी घटना; चिमुरडीच्या हत्येने भिवंडी पुन्हा हादरली

भिवंडी; पुढारी वृत्तसेवा : रविवारी एका चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच भिवंडी पुन्हा एकदा अशाच एका घटनेने हादरली आहे. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागाव परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. आई-वडील मजुरी कामावर गेले असताना अज्ञात नराधमाने हीच संधी साधत तीन वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील नागाव भागातील एका चाळीत भंगार फेरीवाला व्यवसाय करणारा आपली पत्नी व तीन मुलांसह दोन महिन्यापुर्वी हे कुटुंबीय वास्तव्यास आले आहेत. गरिबीमुळे पत्नी सुद्धा मजुरी कामावर जात आहे. घरात तीन वर्षीय मुलीसह दोन पाच व सहा वर्षांच्या मुलांसोबत घरात असताना मंगळवारी महिला सकाळी कामावर गेली दुपारी एक वाजता महिला घरी आली. त्यावेळी तीन वर्षीय मुलगी आढळून न आल्याने परिसरात तिचा शोध घेऊन ही सापडली नाही. सायंकाळी आठ वाजता महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात मुलीच्या हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून चिमुरडीचा शोध घेण्यासाठी जंगजंग पछाडले परंतु चिमुरडीचा शोध लागला नाही. बुधवारी सकाळी त्याच परिसरातील एक चाळीच्या पहिल्या मजल्यावरील
अडगळीच्या खोलीत चिमुरडीचा मृतदेह आढळून आला.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून शांतीनगर पोलिसांना संपूर्ण परिसरात आरोपीचा शोध घेण्यासाठी झडती सत्र सुरू केले आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबई जे. जे रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शहरातील चार दिवसात घडलेल्या दुसऱ्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दाखल घेत आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक तैनात करण्यात आले असून चाळीत राहणाऱ्या कुटुंबियांची माहिती चाळ मालकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात देण्याचे आव्हान केले आहे. अशी माहिती न देणाऱ्या चाळमालकांवर पोलीस विभागातर्फे कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.

Back to top button