

ठाणे : पुढारी वृत्तसेवा; माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील मोठी गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली. खवबरदारीचा उपाय म्हणून कोर्ट नाकाकडे येणारे दोन्ही मार्ग पोलिसांनी बंद केले आहेत. दरम्यान आव्हाडांच्या जामीनासंदर्भात न्यायालयाकडून काय निर्णय येतो याची वाट कार्यकर्ते पाहत आहेत.
सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये 'हर हर महादेव' या मराठी चित्रपटाचा शो सुरू होता. या चित्रपटामध्ये शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्याविषयीच्या इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी शो बंद पाडला. यावेळी काही प्रेक्षकांना आव्हाडांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मनसेनं यासंदर्भात टीका केल्यानंतर आव्हाडांविरोधात वर्तकनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आली.
आव्हाड यांच्या वतीने ॲड प्रशांत कदम यांनी आव्हाडांच्या अटकेवर युक्तिवाद केला. आव्हाड आणि इतर लोकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे असल्याचा युक्तिवाद ॲड कदम यांनी केला. दाखल करण्यात आलेले गुन्हे जाणीवपुर्वक करण्यात आले असून कलम ७ हा वाढवू शकत नाही, कारण तशी तरतूद १९३२ साली करण्यात आली आहे जी महाराष्ट्रात लागू होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी देखीलमी स्वतःहून चौकशी करता आलो होतो असे सांगत तपासाला मी पूर्ण सहकार्य केले असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. ही अटक ही पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावाही कदम यांनी केला आहे. सरकारी वकील म्हणून ॲड अनिल नंदीगिरी यांनी कोर्टात पोलिसांची बाजू मांडली.
आव्हाडांना जेव्हा ताब्यात घेण्यात आल्यानंतर आयपीसी 141,143,146,149,323,504, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(3), 135 हे कलम लावण्यात आले होते. त्यानंतर कलम 7 वाढवून त्यांना तसेच त्यांच्यासोबत 11 जणांना अटक करण्यात आली असून कलम ७ हे वाढवू शकत नाही, कारण तशी तरतूद १९३२ साली करण्यात आली आहे जी महाराष्ट्रात लागू होत नसल्याचे आव्हाडांचे वकील ॲड कदम यांनी युक्तिवाद केला.
हेही वाचा :