

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते…सुरेश भट यांच्या या काव्यपंक्ती सर्वश्रुत आहेत. मात्र कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली स्टेशजवळच्या स्मशानभूमीमध्ये होणारे अंत्यसंस्कार पाहिल्यानंतर इथल्या मृतदेहांना मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आंबिवली गावातील स्मशानभूमीवर गेल्या 5 वर्षांपासून पत्र्याच्या शेडअभावीच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. तर पावसाच्या पाण्यामुळे सरणाला वारंवार अग्नी द्यावा, लागत असल्याची व्यथा स्थानिकांनी मांडली.
आंबिवली गावामध्ये स्मशानासाठी जागा नसल्याने 5 वर्षांपूर्वी स्थानिक तरुण एकत्र आले. या तरुणांनी लोकवर्गणीतून नदीकिनारी असलेल्या जागेवर स्मशानभूमीसाठी पायाभरणी केली. तसेच जमा झालेल्या निधीमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक चौथरा बांधत शेड टाकण्यासाठी सिमेंटचे खांबही उभे केले. मात्र उर्वरित बांधकामासह पत्र्याचे शेड उभे करण्यास निधी कमी पडल्याने पुढील सर्व काम ठप्प झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. परिणामी याठिकाणी गेल्या 5 वर्षांपासून शेडविनाच अंत्यसंस्कार होत आहेत. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत तर येथे आणणार्या मृतदेहांची अधिकच हेळसांड होत आहे. अनेकदा पावसाळ्यात अर्धे मृतदेह जळून विझून गेलेले असतात. परिणामी पाऊस थांबल्यावर पुन्हा अग्नी द्यावा लागत असल्याची माहितीही स्थानिकांनी दिली.