ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकासह कळवा, मुंब्रा रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरीचे प्रकार वाढत आहेत. चोरट्यांनी दिवसाढवळ्या एका दिवसात या स्थानकांतून तब्बल 17 मोबाईलची चोरी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबतची तक्रार लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान इतर दिवशी हा आकडा 5 ते 6 इतपत असतो; परंतु एका दिवसात अचानक एवढ्या मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल झाल्याने प्रवासी संतापले आहेत. दरदिवशीच्या तुलनेने 29 ऑक्टोबर, रोजी गुन्हे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ठाणे रेल्वे स्थानक अतिगर्दीचा झोन असला तरीही इथल्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे यंत्रणा उपलब्ध असतात. दरम्यान प्रवाशांच्या म्हणण्यानुसार नियमित मोबाईल चोरी करणाऱ्या चोरांचा पर्दाफाश का होत नाही? आणि चोरी प्रवाश्यांच्या बेजबाबदारपणामुळे झाली असली तरीही संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे मोबाईल चोरांना वाव भेटतो, असे प्रवाश्यांचे म्हणणे आहे.
प्रवाश्याने प्रवासादरम्यान जबाबदारीने प्रवास करावा याकरिता लोहमार्ग पोलीस ठाण्याने ठाणे, कळवा, मुंब्रा रेल्वे स्थानकांवर वस्तू चोरी संदर्भात प्रवाश्यांमध्ये जनजागृती करावी अशी प्रवाश्यांची मागणी आहे.
तसेच ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानक भरपूर प्रमाणात वर्दळीत आणि सक्रिय वातावरण असते. इथून दर दिवशी तब्ब्ल 5000 हून जास्त नागरिक कामानिमित्त प्रवास करत असतात. त्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गर्दीमुळे भरपूर प्रवाश्यांच्या आवश्यक वस्तूंची, मोबाईलची नियमित चोरी होत असते. परंतु प्रवासादरम्यान रेल्वे स्थानकावर वारंवार होणाऱ्या मोबाईल चोरीच्या घटना पाहता चोरट्यांवर आळा घालण्यात अपयश येत असल्याचे दिसून येते. नियमित चोरांकडून महागडे मोबाईलही चोरी होतात. मात्र चोरीची तक्रार केल्यानंतरही त्वरित कारवाई होत नसल्याचे मत मोबाइल चोरीला गेलेल्या प्रवाशांंतून व्यक्त होत आहे.
चोरांचा पर्दाफाश करण्याची मागणी
काही प्रवाशांच्या म्हणण्यानुसार मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकावर भरपूर प्रमाणात मोबाईल आणि वस्तूंची चोरी होते. तसेच प्रवासादरम्यान वस्तूंची काळजी नसल्यास लोकलमधून आणि प्लॅटफॉर्मवर गर्दीची संधी साधत चोर हातसफाई करत असतात. अशा स्टेशनवरच्या चोरांचा तपास करून पर्दाफाश करण्यात यावा व चोरीच्या प्रकारावर आळा घालण्यात यावा, अशी प्रवाश्यांची मागणी आहे.