ठाणे : राजकीय हत्येचा बनाव रचून प्रभाग रचनेत हेराफेरी ? जितेंद्र आव्हाडांवर महापौरांचा आरोप | पुढारी

ठाणे : राजकीय हत्येचा बनाव रचून प्रभाग रचनेत हेराफेरी ? जितेंद्र आव्हाडांवर महापौरांचा आरोप

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना करताना माझी राजकीय हत्येचा बनाव (प्रयत्न)  झाला होता, असा आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच, पालिकेने निवडणूक आयोगाला सादर केलेला मूळ आराखडा जाहीर करण्याची मागणीही आव्हाड यांनी केली आहे. यानंतर मग हा मूळ गोपनीय आराखडा आव्हाड यांनी पाहिला आणि नंतर तो बदलण्यास भाग पाडला असा अर्थ घ्यायचा का ? असा गंभीर आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे.

पालिका निवडणूक आयोगाला सादर केलेला प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा हा गोपनीय असताना तो आव्हाड यांच्या हाती लागलाच कसा ? असा प्रश्न उपस्थित केला. आणि आव्हाडांनी निवडणूक आयोगाला सदोष माहितीच्या आधारे निवेदन देत त्यांच्यावर दबाव टाकून आराखडा बदलण्यास भाग पाडल्याचा संशयही महापौरांनी व्यक्त केला आहे. तसेच आपली राजकीय हत्या होईल, असा बनाव रचून प्रभाग रचनेत हेराफेरी करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत त्याची सखोल चौकशीची मागणी म्हस्के यांनी केली आहे.

आयोगाच्या आराखड्यात कायद्याची पायमल्ली करण्यात आली असून मुंब्र्यातील प्रभाग वाढविण्याच्या नादात दिवा परिसरातील लोकप्रतिनिधींच्या संख्येला कात्री लावण्यात आली आहे. अंतिम प्रभाग रचनेत दिवा भागाला योग्य प्रतिनिधीत्व मिळाले नाही तर, या आराखड्याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.  ( राजकीय हत्येचा बनाव )

ठाणे महापालिकेने प्रभागांचा कच्चा आराखडा निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर तो अधिकृतरित्या जाहीर होईपर्यंत गोपनीय राखणे अभिप्रेत होते. मात्र, हा कच्च्या आराखडाचती माहिती गृहनिर्माण मंत्र्यांना आधीच मिळाली असल्याने त्यांच्या वक्तव्यावरून समजते आहे. तसे त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनातही मान्य केलेले आहे. त्यामुळे प्रभाग रचना जाहीर करताना गोपनीयतेचा भंग झालेला आहे.

आव्हाड यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात चुकीची माहिती सादर करून निवडणूक आयोगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेल्याचे उघड झाले आहे. आयोगाने देखील त्या पत्रातील आकडेवारीची खातरजमा न करता प्रभाग रचना जाहीर केल आहे की काय?, असा संशय निर्माण होण्याजोगी परिस्थिती असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button