माळशिरस : अनंत दोशी : केंद्र शासनाने वारकर्यांच्या सोयीसाठी आळंदी-पंढरपूर व देहू-पंढरपूर हा राष्ट्रीय मार्ग घोषित केला. त्यासाठी निधीची तरतूद करून या दोन्ही महामार्गांचे कामही चालू केले. परंतु, ब्रिटिश काळात मंजूर झालेला लोणंद-पंढरपूर हा रेल्वेमार्ग वारकर्यांच्या व शेतकर्यांच्या सोयीसाठी कधी पूर्णत्वास जाणार, असा प्रश्न माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक व वारकरी सांप्रदायांतून विचारला जात आहे.
स्वातंत्र्यानंतर देशात अनेक राजकीय पक्षांची सरकारे आली. या मार्गासाठी अनेक वेळा अनेक लोकप्रतिनिधींनी वारंवार केंद्र सरकारकडे मागणी केली. तसेच केंद्र सरकारकडून अनेक वेळा घोषणाही झाल्या. परंतु, अद्याप या मार्गासाठी सरकारकडून कसल्याही हालचाली होताना दिसत नाहीत.
आळंदी ते पंढरपूर व देहू ते पंढरपूर या मार्गावर कायम वारकर्यांची, भाविकांची गर्दी असते. आळंदी व पंढरपूर या ठिकाणी अनेक वारकरी पायी वारी करतात. पंढरपूर येथे आषाढी वारीचा सोहळा मोठ्या प्रमाणात भरतो. त्यासाठी राज्यातून भाविक जमा होतात. आळंदी-देहू व पंढरपूरचे धार्मिक महत्त्व पाहून केंद सरकारने आळंदी-पंढरपूर व देहू- पंढरपूर या मार्गांना राष्ट्रीय मार्गांचा दर्जा देऊन त्यासाठी निधीची तरतूद केली. कामही चालू केले. त्यामुळे फलटण ते पंढरपूर हा रेल्वेमार्ग झाल्यास अनेक भाविकांना त्याचा फायदा होणार आहे. कारण, पंढरपूर येथे चार मोठ्या वार्या असतात तसेच, इतरवेळी भाविकांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे या रेल्वेमार्गाचा फायदा भाविकांना होणार आहे. तसेच, या रेल्वे मार्गामुळे परिसरांतील शेतकर्यांना आपला शेतीमाल, भाजीपाला पुणे, मुंबई या ठिकाणी कमी पैशांत पाठवता येणार आहे तसेच त्यांना आर्थिक उत्पन्नही चांगले मिळणार आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग सर्वांसाठी फायद्याचा ठरणार आहे.
लोणंद-पंढरपूर या रेल्वे मार्गासाठी मध्यंतरी माळशिरस तालुक्यातून जाणार्या या मार्गांचा पुन्हा ब्रॉडगेज सर्व्हे करण्यात आला. त्याच्या हद्दीही निश्चित करण्यात आल्या. परंतु, नंतर मात्र पुढे काहीच प्रगती झाली नाही. या रेल्वे मार्गासाठी जी जमीन अधिग्रहण करण्यात आली, त्यामध्ये कुठेही जास्त चढ-उतार नाहीत. त्यामुळे हा रेल्वेमार्ग कमी पैशात तयार होणार आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात अनेक नवीन रेल्वेमार्ग मंजूर करून ते पूर्णही करण्यात आले. परंतु, ब्रिटिशांनी मंजूर केलेला, जमिनीचे अधिग्रहण पूर्ण असलेला, कमी बजटमध्ये तयार होणारा व वारकरी व शेतकर्यांसाठी फायद्याचा असलेला हा रेल्वेमार्ग लाल फितीत का अडकला आहे याकडे सरकार कधी पाहणार आहे, असे नागरिकांतून बोलले जात आहे.
लोणंद -पंढरपूर हा 140 किलोमीटरचा रेल्वेमार्ग ब्रिटिश सरकारने 1927 साली मंजूर केला होता. त्यावेळी हा रेल्वेमार्ग नॅरोगेज होता. त्याचा सर्व्हे होऊन त्यासाठी जमिनीही अधिग्रहण करण्यात आल्या होत्या. त्यानंतर नॅरोगेज रेल्वे बंद झाल्याने त्याचे रुपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्यात आले. त्यानुसार काही दिवसांपूर्वी लोणंद ते फलटण हा रेल्वेमार्ग तयार करण्यात आला. परंतु, फलटण ते पंढरपूर या मार्गाचे काम मात्र रखडले.