सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : एस.टी. प्रवासात महिलांना सरसकट 50 टक्के तिकीट दरामधे सवलत जाहीर करण्यात आली आहे. घोषणा झाली असली तरी शासन आदेशाचे अधिकृत परिपत्रक जाहीर झालेले नाही. मात्र घोषणा झाल्याने प्रवास करणार्या महिला तिकिटात सवलतीसाठी वाहकांरोबर हुज्जत घालताना दिसून येत आहेत.
राज्याच्या ग्रामीण भागात एस. टी. बसचा अनेकांना आधार असतो. ग्रामीण भागातील अनेकजण आजही एस.टी.वर अवलंबून आहेत. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व महिलांना एस.टी. प्रवासात सरसकट 50 टक्के तिकीट दरात सवलतीची घोषणा केली. अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या घोषणेची माहिती समाजमाध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचली. परंतु प्रत्यक्षात प्रवास करताना पूर्ण तिकिटाची आकारणी होत असल्याने महिला प्रवासी वाहकांना जाब विचारून वाद घालताना दिसत आहेत. ग्रामीण भागात याचे प्रमाण अधिक असल्यानेे एस. टी. कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
महिलांसाठी एस.टी. प्रवासात सरसकट 50 टक्के सवलतीचे अधिकृत परिपत्रक राज्यातील विभागीय कार्यालयास अद्याप मिळाले नाही. त्यामुळे एस.टी. कर्मचारी व प्रवाशांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. सवलतीसाठी आक्रमक झालेल्या महिला काहीकेल्या ऐकत नाहीत. त्यामुळे कर्मचार्यांना ग्रामीण भागांमधे ड्यूटी करणे जिकिरीचे झाले आहे. शासनाने परिपत्रक काढून सवलतीच्या अंमलबजावणीबाबत माहिती द्यावी, अशी मागणी एस.टी. कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे.