सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
आपल्या देशात स्पर्धा परीक्षा देऊन आयएएस, आयपीएस बनण्याची युवकांमध्ये क्रेझ आहे. आता त्यासोबतच त्यांनी स्टार्टअपकडे लक्ष केंद्रित करून आपल्या कल्पनाशक्तीला चालना द्यावी. त्यातून छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय उभे करून उद्योजक होण्याचे स्वप्न अंगीकारण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
मंगळवारी (दि. 1) वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 20 व्या युवा महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, राजाभाऊ सरवदे, प्रा. सचिन गायकवाड, डॉ. बी. पी. रोंगे, डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. राजेंद्र वडजे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
जिल्हाधिकारी म्हणाले, विद्यार्थी कलाकारांनी युवा महोत्सवातील प्रत्येक कलाप्रकारात सहभाग घेऊन आनंद लुटावा. चांगली कला सादर करून टॅलेंट सिद्ध करावे. त्यासोबतच युवकांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक दिवस आत्मपरीक्षण करावे. कुलगुरू डा. महानवर म्हणाले, स्पर्धा म्हटले की विजय-पराजय येतो. मात्र, सहभाग हाच खरा विजय असतो. युवा महोत्सव युवा विद्यार्थी कलाकारांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे. कलाकारांना चांगले व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येते. सोबतच स्टार्टअपसाठी देखील विद्यापीठ नेहमी प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी नेहमी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बनण्याकडे लक्ष द्यावे.
आमदार देशमुख म्हणाले, स्टार्टअपबाबत विद्यार्थी व शिक्षकांनी गांभीर्याने विचार करावा. विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त कलागुणांना व कौशल्यांना वाव देऊन उद्योजक बनण्याकडे लक्ष द्यावे. शासनाच्या पर्यटन तसेच विविध महामंडळाकडून पर्यटन व उद्योग उभारण्यासाठी बिगरव्याज वित्त पुरवठा होतो. त्याचा लाभ युवकांनी घ्यावा. विद्यापीठाने व विद्यार्थ्यांनी अशी कामगिरी करावी की, ज्यामुळे संपूर्ण जगात नावलौकिक प्राप्त होईल. प्रास्ताविकेतून विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी महोत्सवात 62 महाविद्यालयांमधून 1800 विद्यार्थी सहभागी झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने झाली. राष्ट्रगीताने समारोप झाला. सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. सतीशकुमार देवकर यांनी मानले.
युवा महोत्सवाच्या उदघाटनासाठी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील येणार होते. मात्र, त्यांची या कार्यक्रमाला अनुपस्थिती होती.
लोकमंगल महाविद्यालयामध्ये राम मंदिर बांधले आहे. या राम मंदिरामध्ये प्रारंभी कुलगुरू डॉ. महानवर, आमदार देशमुख व सिनेट सदस्यांच्या उपस्थितीत आरती झाली. त्या सर्वांनी रामाचे दर्शन घेतले.