बार्शी : झारखंडमधील एका महिलेसह तिच्या चार अल्पवयीन मुलांना डांबून ठेऊन बचत गटाचे तुम्ही घेतलेले तुमच्या गावाकडचे कर्ज आम्ही भरत आहोत ते फिटेपर्यंत तुम्हाला काम करावे लागेल अशी सक्ती करून त्यांचा छळ केल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात तालुक्यातील चुंब येथील एकावर वेठ बिगार व बालकामगार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. माय लेकरांची सुटका करण्यात आली आहे.
गणेश भगरे यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. झाकीर हुसेन इलाही सय्यद (रा. चुंब) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सबिता देवी, आयुषकुमार (वय 10), पुनमकुमारी (वय आठ), प्रितीकुमारी (वय पाच), पियुषकुमार (वय नऊ महिने)अशी सुटका करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सहाय्यक कामगार आयुक्त सोलापुर यांच्या आदेशाने फिर्यादी व सोबत निलेश येलगुंडे, सोमीनाथ शिंदे, बाळासाहेब ठाकुर व बार्शी तालुका पोलीस ठाणेकडील पोलीस कर्मचारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसुल अधिकारी आदी चुंब येथे झाकीर हुसेन इलाही सय्यद यांच्या शेतावर गेले. तेव्हा तिथे पत्राशेड मध्ये सविता देवी व सोबत चार अल्पवयीन लहान मुले दिसून आली.
सविता देवी यांना विचारणा केली असता सविता देवी व त्यांची अल्पवयीन मुले तीन वर्षापासून येथे काम करत असल्याचे सांगितले. पुरेसे अन्न मिळत नाही, कामाबद्दल कोणताही मोबदला किंवा पगार दिला जात नाही, लहान मुलांची शिक्षणाची सोय केली नाही मुळगावी जाण्याची संधी दिली जात नाही, तसा प्रयत्न केल्यास एकटी निघून जाण्यास सांगितले जाते, असे सांगितले.
बचतगटाचे तुम्ही घेतलेले तुमच्या गावाकडचे कर्ज आम्ही भरत आहोत. ते फिटे पर्यंत तुम्हाला काम करावे लागेल, अशी सक्ती केली असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक सुधीर गुळमे करत आहेत.