

पोखरापूर : मोहोळ-पंढरपूर-आळंदी पालखी महामार्गावर पोखरापूर गावच्या हद्दीत आज (रविवार, दि.२६ ऑक्टोबर) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. रत्नागिरी आगाराच्या भरधाव एसटी बसने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली, ज्यामुळे ट्रॅक्टर पलटी झाला आणि बस दुभाजकावर चढली.
खवणी (ता. मोहोळ) येथील शेतकरी अजय राजू काकडे हे त्यांच्या ट्रॅक्टरमधून (क्र. १३, ई.एस.०१८९) कोबी आणि इतर भाजीपाला घेऊन पहाटे मोहोळ मार्केट यार्डकडे निघाले होते. त्याचवेळी रत्नागिरी आगाराची एसटी बस (क्र. एम. एच.८, ए.पी.५७२४) भरधाव वेगात मोहोळच्या दिशेने जात होती. पोखरापूर गावाजवळील वळणावर एसटी बसने ट्रॅक्टरला मागून धडक दिली.
या अपघातात ट्रॅक्टर पलटी झाला, तर ट्रॉली बाजूला फेकली गेली आणि एसटी बस दुभाजकावर चढली. ट्रॅक्टर चालक अजय राजू काकडे यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तातडीने सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ट्रॅक्टरवरील अन्य दोन व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या असून त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मोहोळ पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, अपघात पथकाचे हवालदार अतुल क्षीरसागर अधिक तपास करत आहेत.