![वंदे भारत रेल्वे](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F10%2Fsur-3.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार आहे . ही गाडी सोलापुरातून मुंबई अवघ्या सात तासात गाठणार आहे. ही गाडी सुरु होण्याचे संकेत मिळाल्याने सोलापूरकरांमधून आनंद व्यक्त होत आहे .
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे प्रशासनाकडून देशभरात नव्या रेल्वे गाड्या सुरू करण्याचे व तसेच अनेक गाड्यांना एक्सप्रेसचा दर्जा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता . याबाबत दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याशी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाय स्पीड रेल्वे संदर्भात चर्चा केली . यावर रेल्वे मंत्र्यानी महाराष्ट्रासाठी लवकरचं मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यासंदर्भात सकारात्मकत दर्शवली आहे .
सोलापूर शहर हे तीन राज्यांना जोडणार शहर असल्यानं सोलापूरची निवड करण्यात आली आहे . पुढील दोन वर्षात देशभरात 400 वंदे भारत एक्सप्रेस धावतील असा विश्वास रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे .
बदलत्या काळानुसार भारतीय रेल्वेमध्येही अनेक बदल झाले असून भारतीय रेल्वे प्रवाशांना दररोज नवनवीन सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यापैकीच एक सेमी-हाय स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस देशभरासह महाराष्ट्रातही धावत आहे.
मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याच्या निर्णयाने रेल्वे प्रशासनाकडून सोलापुरकरांसाठी दिवाळी निमित्त एक आनंदाची बातमी दिली आहे . सोलापूरकर ज्या ट्रेनची उत्सुकतेने वाट पाहत होते . अखेर ती वंदे भारत एक्सप्रेस पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई -पुणे या मार्गावर धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला होती. त्यानंतर आता हीच रेल्वे मुंबई सोलापूर या मार्गावर धावणार असून गाडीचा ताशी वेग १८० किलोमीटर इतका आहे. या गाडीमुळे प्रवाशांना सुखद प्रवासाचा आनंद अनुभवता येणार आहे त्याचबरोबर वेळेची ही मोठी बचत होणार आहे.