पोखरापूर : पुढारी वृत्तसेवा : अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याच्या मागणीसाठी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या सदस्यांनी मोहोळ ते मुंबई असा ट्रॅक्टर, रिक्षा, बैलगाडीचा आज (दि.३) भव्य मोर्चा काढला. माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Solapur News)
मागील महिन्याभरापासून मोहोळ तालुक्यातील अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याच्या मागणीसाठी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीने सातत्याने वेगवेगळे आंदोलने करून प्रशासनाला निवेदन देण्यात येत आहेत. यासंदर्भात मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत सदरचे अप्पर कार्यालय हे भौगोलिक दृष्ट्या योग्य नसल्याचे दाखवत यामुळे नागरिकांची गैरसोय होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या पत्रावरच तात्पुरती स्थगितीचा शेरा मारला. (Solapur News)
मात्र, स्थगितीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत न आल्याने त्यांनी नूतन कार्यालयाची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानंतर मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती आक्रमक झाल्यानंतर परिस्थिती जैसे थे राहिली. मात्र, जोपर्यंत सदरचे कार्यालय रद्द झाल्याचा आदेश निघत नाही. तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीने घेतली. त्याचाच एक भाग म्हणून मोहोळ ते मुंबई ट्रॅक्टर रिक्षा बैलगाडीच्या माध्यमातून मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, संजय क्षीरसागर, सत्यवान देशमुख, महेश देशमुख, अतुल क्षीरसागर, मंगेश पांढरे, अजय कुर्डे, संतोष सोलनकर, सतिष काळे, तन्वीर शेख आदींसह मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये १० बैलगाडया, २४ ट्रॅक्टर, २५ रिक्षा , २ टमटम व इतर चारचाकी ४ अशी एकूण ६५ वाहने आहेत.