पोखरापूर : नव्यानेच अनगर येथे मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यासाठी मोहोळ येथे गेल्या दोन दिवसापासून चार जणांनी आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषण प्रकरणी प्रशासनस्तरावर अद्यापही दखल घेतली नसल्याने मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीने बैठक घेतली. या बैठकीमध्ये अप्पर तहसील कार्यालय रद्द होईपर्यंत विविध आंदोलने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या बैठकीत यापुढे तिरडी आंदोलन, महिला मोर्चाद्वारे साडी चोळी, बांगडी आहेर आंदोलन, आसूड मोर्चा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोर्चा, बोंबाबोंब आंदोलन, थाळी नाद आंदोलन, मुंडन आंदोलन, घंटानाद आंदोलन, मोहोळ शहरात एक तास दिवा बंद आंदोलन यासह संपूर्ण मोहोळ तालुका बंद आंदोलन करण्याचे सर्वानुमते ठरले आहे. येणाऱ्या १५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय येथे होणाऱ्या ध्वजारोहणापासुन लोकशाही मार्गाने आमदार यशवंत माने यांना रोखण्यात येणार आहे. या तालुक्यात गावनिहाय जनचळवळ राबवण्यासाठी कोअर कमिटीचा गावनिहाय दौरा आयोजित करण्यात आल्याची माहिती यावेळी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीने उमेश पाटील यांनी दिली. या बैठकीला ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे, शिवसेना नेते दीपक गायकवाड, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, संजय क्षीरसागर, मानाजी माने, बाळासाहेब गायकवाड, सीमाताई पाटील, पद्माकर देशमुख, विक्रम देशमुख, सुनील चव्हाण, सुशील क्षीरसागर, राहुल क्षीरसागर, सतीश पाटील, बाळासाहेब वाघमोडे, किशोर पवार, भीमराव वसेकर, विकास वाघमारे सिद्धेश्वर अनुसे आदीसह विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनाच्या सुरुवातीपासून जेवढे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी यामध्ये सामील होते, ते सर्वजण एकत्रितपणे काम करत आहेत. हे आंदोलन भरकटलेले नाही, समन्वयातुन सुरू असुन या पुढीत काळात आणखी तिव्र लढा उभा करणार असल्याचे दिपक गायकवाड म्हणाले.