

बार्शी : विवाह सोहळ्यानंतर नव दाम्पत्यांना घेऊन देव दर्शनासाठी तुळजापुरला जात असताना कारला भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकची कारला समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की, कार पुलावरून खाली जाऊन तीन चारवेळा पलटी झाली. अपघातात कारचा चक्काचूर झाला असून ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. ही घटना आज रविवारी (दि.३०) सायंकाळी बार्शी लातूर राष्ट्रीय महामार्गावर घारी शिवारात घडला.
गौतम भगवान कांबळे (वय ६५), जया गौतम कांबळे (वय ६०), नवरीची मावशी (रा.सर्व पनवेल),सारिका संजय वाघमारे (वय ४५), संजय तुकाराम वाघमारे (वय५०, मार्केट यार्ड वाघ वस्ती, कुर्डूवाडी) असे या अपघातातील मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, चार दिवासापुर्वी लग्न झाल्यानंतर नव दाम्पत्य हे देवदर्शनासाठी पनवेलहून कुर्डूवाडी येथील मामांना घेऊन तुळजापूराला देवदर्शनास जात होते.दरम्यान बार्शी-लातूर महामार्गावर घारी पासून एक कि.मी. अंतरावर जांभळबेट येथील पुलावर भरधाव मालट्रकने या कारला समोरून जोरदार धडक दिली. अपघातात कारचा चक्काचूर झाला असून कारमधील सात पैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.परंतु अपघातात नव विवाहित नवरा-नवरी सुदैवाने बचावले आहेत.
मृतांमध्ये तीन महिला व दोन पुरुषाचा समावेश आहे. जखमी नव विवाहित दाम्पत्य अनिकेत गौतम कांबळे (वय२८), मेघना अनिकेत कांबळे (रा.दोघे पनवेल)यांना बार्शी येथील जगदाळे रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. हा दुर्दैवी अपघात एवढा भीषण होता की चारचाकी पुलावरून खाली जाऊन गाडीच्या तीन चार पलट्या होऊन चक्काचूर झाला होता. तर मालट्रक ही रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. पुलावर गार्ड स्टोन नसल्याचे दिसून आले.