

Solapur Onion Market Collapse
कामती : कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे संतप्त झालेल्या बेगमपूर येथील प्रगतशील शेतकरी लखन माने यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रातील कांदा पेटवून देत तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी वर्गातून संतापाची लाट उसळली आहे.
लखन माने यांनी मोठ्या आर्थिक गुंतवणुकीतून दोन एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती. बियाणे, रासायनिक खते, औषधे, मजुरी तसेच सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. मात्र बाजारात कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण बनले आहे.
माने यांनी बाजारात विक्रीसाठी पाठवलेल्या १०० पोत्यांच्या कांद्याला अवघे १ हजार ४०० रुपये मिळाल्याने ते हतबल झाले. अखेर संतापाच्या भरात त्यांनी शेतातील उभ्या कांद्याला आग लावत निषेध व्यक्त केला.
“शेतकऱ्यांनी जगायचे कसे?” असा सवाल आता परिसरातून उपस्थित केला जात असून कांद्याला योग्य हमीभाव द्यावा तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.