

करमाळा: भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने वारकऱ्याला ठोकरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. गिरीधर शहाजी गाडेकर (वय 83) रा. शिंगवे केशव, तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर असे या अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. सदरचा अपघात मंगळवार एक जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास करमाळा तालुक्यातील देवळाली येथील पांडुरंग गिरी गोसावी यांच्या निवासस्थानासमोर झाला आहे. अपघातात मृत्यू झाल्यानंतर दिंडीचालक ह भ प सुखदेव महाराज गाडेकर यांना मानसिक धक्का बसला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करावे लागले. श्रीराम सेवाधाम शिंगवे दत्ताचे, तालुका पाथर्डी ,जिल्हा अहिल्यानगर येथून ह भ प सुखदेव महाराज गाडेकर यांची दिंडी पंढरपूर येथे प्रतिवर्षी जाते.
करमाळा येथे करमाळा नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रदीप शिंदे तसेच डॉक्टर किशोर शेळके यांच्याकडे सकाळच्या चहापान करून नवनाथ थोरात पेंटर यांच्याकडे भोजन करून ती निघते. ती देवळाली येथील पांडुरंग गिरी गोसावी यांच्याकडे मुक्कामाला असते. या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास गाडेकर हे झोपण्याची व्यवस्था पाहण्यासाठी सतीश कानगुडे यांच्या कडे गेले होते. त्या नंतर ते जेवणासाठी पांडुरंग गिरी गोसावी यांच्या कडे निघाले होते. परंतु ते बराच वेळ झाला न आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला असता त्यांना रस्त्यावरून जाताना अज्ञात वाहनाने मुख्य रस्त्यावर ठोकरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आले.
ते रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेने तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांना दोन जुलै रोजी शवविच्छेदन करून त्यांना शिंगवे दत्ताचे या त्यांच्या मूळ गावी नेऊन दोन जुलै रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत करमाळा पोलिसांनी या अपघाताची नोंद करून पंचनामा केला आहे. या धक्कादायक घटनेनंतर दिंडी चालक ह भ प सुखदेव महाराज गाडेकर यांनाही धक्का बसल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करावे लागले. यानंतर सदरची दिंडी ही पुढे पंढरपूर कडे पांडुरंगाच्या ओढीने मार्गस्थ करण्यात आली. सदरच्या घटनेबाबत पोलिसात याची नोंद करण्यात आली आहे.
पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे या मयत झालेल्या वारकऱ्याच्या वारसांना तात्काळ चार लाख रुपयाची मदत शासनाने त्वरित देऊन केलेल्या घोषणेचे पालन करावे. अशी मागणी गहिनीनाथ ननवरे, माजी सभापती, पंचायत समिती,करमाळा यांनी केली आहे.