सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : रेनगर येथील 15 हजार घरांच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींची गॅरंटी केवळ देशातच नाही, तर परदेशातही चालत असल्याचा मुद्दा आपल्या भाषणात उपस्थित केला. त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केल्यानंतर मोदी यांनी शिंदे यांची पाठ थोपटली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नुकताच दावोस येथे झालेल्या वेगवेगळ्या करारांमध्ये तीन लाख 53 हजार कोटींचे करार करण्यात आले आहेत. त्याठिकाणी वेगवेगळ्या देशातील नेतेमंडळी उपस्थित होती. त्यांच्या मुखातूनही पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीचा उल्लेख केला जात होता. त्यावेळी माझे मन भरून आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
रेनगरच्या घरांचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर त्याचे लोकार्पणही मोदींच्याच हस्ते केले जात आहे. यालाच म्हणतात मोदींची गॅरंटी. संत तुकाराम महाराजांनी म्हटलेय, 'बोले तैसे चाले, त्याची वंदावी पाऊले' हे वाक्य मोदी यांना निश्चितच लागू होतेे. राज्यातील अनेक योजनांचे भूमिपूजन व लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते झाले. त्यामुळे देशात यापुढेही मोदी सरकार येणार आहे.
'अब की बार मोदी सरकार, अब की बार 400 पार' असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मोदींचे कौतुक केले. ते भाषण करून आपल्या जागेवर बसल्यानंतर मोदींनी त्यांची पाठ थोपटली.