

सोलापूर : बदलती जीवनशैली, कागदी कपातील चहा पिणे, तंबाखू-सुपारीचे सेवन करणे, यामुळे देशात पुरुषांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. या आजाराच्या रुग्णसंख्येत सतत वाढ होत असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) अहवालातून स्पष्ट झाले आहे. यामुळे टपरीवर मिळणारा कागदी कपातील चहा मृत्यूला आमंत्रण देणारा ठरत आहे.
चुकीच्या जीवशैलीसह उशिरा होणारे निदान हेही या आजाराच्या वाढीमागील मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे. गत तीन वर्षांत या रोगाची लागण सुमारे पाच लाख रुग्णांना झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे या आजाराला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून तातडीने अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) अभ्यासानुसार, पुरुषांमध्ये तोंडाचा कर्करोग हा देशात सर्वाधिक आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे. देशातील काही भागांमध्ये अन्य कर्करोगांपेक्षाही तोंडाच्या कर्करोगाने बाधित रुग्ण अधिक असल्याचे दिसून आले आहे. ग्रामीणपेक्षाही शहरात हा आजार वेगाने पसरत आहे. 30 ते 50 वयोगटातील तरुणांमध्येही त्याचे प्रमाण वाढताना दिसत असून, ही बाब चिंताजनक आहे.
हा कर्करोग वृद्धांपुरता मर्यादित नाही, तर तरुणांमध्येही याचे लक्षणीय प्रमाण आहे. बदलती जीवनशैली, कागदी कपातील चहा पिणे, तंबाखू-सुपारीचे सेवन करण्यासह वाढती व्यसनाधीनता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या आजाराचे उशिरा होणारे निदान, यामुळेही तरुण पिढी या आजाराला बळी पडताना दिसून येत असल्याचे ‘आयसीएमआर’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. रोगाच्या सुरुवातीच्या काळातील लक्षणांकडे दुर्लक्ष, वैद्यकीय सल्ल्याचा अभाव किंवा त्याकडे दुर्लक्ष, महागडे उपचार, यामुळे या रोगाच्या रुग्णांचा अखेर मृत्यूने होत असल्याचेही अहवालात नमूद आहे.