पंढरपूर : विठ्ठलाचे सोने, चांदीचे दागिने कधी वितळवणार?

पंढरपूर : विठ्ठलाचे सोने, चांदीचे दागिने कधी वितळवणार?

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : भाविक भक्तांनी श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेला छोटे मोठे सोन्याचे, चांदीचे दागिने अर्पण केले आहेत. यामुळे मंदिर समितीकडे 28 किलो सोने व 950 किलो चांदी जमा झाली आहे. हे सोन्या-चांदीचे दागिने वितळविण्यासाठी मंदिर समितीकडून विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव दिला आहे; परंतु यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. आषाढी यात्रेसाठी शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री येतील, तेव्हा याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

दक्षिण काशी म्हणून पंढरपूर तीर्थक्षेत्राची ओळख आहे. पंढरपूर हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने विठ्ठलाच्या दर्शनासाठी वर्षाला सव्वा कोटीहून अधिक भाविक येतात.

भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीमातेला छोटे मोठे सोने व चांदीचे दागिने अर्पण केले आहेत. हे दागिने विठ्ठल व रुक्मिणी मातेला घालता येत नाहीत. त्यामुळे हे दागिने वितळण्यात यावेत, अशी मागणी मंदिर समितीकडून शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे वर्षभरापूर्वी केली आहे. परंतु, यावर अद्याप विधी व न्याय विभागाकडून निर्णय झाला नाही. त्यामुळे हे सोन्याचे व चांदीचे दागिने मंदिर समितीकडे पडून आहेत.

सोने व चांदी विधी व न्याय विभागाच्या परवानगीने स्थापन केलेल्या समितीच्या उपस्थित वितळवण्यात येणार आहेत. यामध्ये देखील दोन मतप्रवाह तयार झाले आहेत. सोने वितळवून वीट तयार करावी असा एक प्रवाह आहे. तर दुसरा प्रवाह सोने वितळवून सुंदर दागिने तयार करावेत असा आहे. याबाबतही संभ्रम निर्माण झालेला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news