

पंढरपूर : श्रावणी सोमवार तसेच पुत्रदा एकादशीचा योग जुळून आल्याने श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. पदस्पर्श तसेच मुख दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नियोजनाअभावी दर्शन रांगेत घुसखोरी, ढकला ढकली झाल्यामुळे चेंगराचेंगरीसदृश्य प्रकार घडत आहे. याचा त्रास भाविकांना विशेषत: महिला भाविकांना बसला आहे. त्यामुळे किमान श्रावण महिन्यात तरी मंदिर समितीने सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी भाविकांमधून केली जात आहे.
शनिवार व रविवारी विकेंडला पंढरपुरात दर्शनासाठी दोन लाखांहून तर श्रावण सोमवार व पुत्रदा एकादशीला देखील चार लाखांहून अधिक भाविक आले. त्यामुळे पदस्पर्श दर्शन रांग पत्राशेडमधून गोपाळपूर रोडवर गेली. सकाळी भाविकांनी मोठी गर्दी झाल्याने पदस्पर्श दर्शन रांगेत घुसखोरी सुरू झाली. त्यामुळे रांगेत थांबलेल्या भाविकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. भाविक भिंतीवरून व बॅरेकेडिंगवरून उड्या मारून रांगेत आले. या गोंधळात महिला भाविकांचे तसेच लहान मुले, वृध्द भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला.
मंदिर समितीने केलेल्या व्यवस्थेतील नियोजनाचा अभाव दिसून आला. गर्दी वाढत असताना दर्शन रांगेत पुरेसे सुरक्षा कर्मचारी, सुरक्षा रक्षक नव्हते. त्यामुळे काही ठिकाणी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाल्याने भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.