उभ्या महाराष्ट्राचे दैवत श्री विठ्ठलाच्या भेटीला भूवैकुंठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व संतांच्या पालख्या येत असतात. त्यात सर्व संतांचे मुकुटमणी संत ज्ञानेश्वरांची पालखी अत्यंत मानाने सर्वांत शेवटी असते...
म्यानवा-तुकाराम व रामकृष्ण हरिनामाचे भजन करत पूर्व परंपरेने ठरलेला हा पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर या प्रवासात १३ ठिकाणी मुक्काम करून १८ दिवसांत २५० किलोमीटर अंतर कापून पूर्ण करतात. या आषाढी वारीचे इतके महत्त्व आहे की, तुकाराम महाराज सांगतात की, पंढरीची वारी आहे माझे घरी। आणिक न करी तीर्थव्रत।। पिढ्यान पिढ्या या वारीचे महत्त्व आहे. ही वारी संत ज्ञानेश्वरांच्याही पूर्वी होती. तिची सुरुवात ज्ञानेश्वरांनी केली असे नाही. त्यांचे वडील विठ्ठलपंत हे पंढरीचे वारकरी होते. ज्ञानेश्वर महाराजांना पंढरीच्या वारीची दीक्षा त्यांचे वडीलबंधू श्री निवृत्तीनाथ यांनीच दिली. आपण आता या
पालखी सोहळ्याचा आरंभ कोणी केला हे बघू. सुमारे १६२ वर्षापूर्वी गुरुवर्य श्री हैवतीबाबा पवार ऊर्फ आरफळकर या थोर सत्पुरुषाने या सोहळ्याचा आरंभ केला. सोहळा गेले १६२ चालू आहे. प्रतिवर्षी त्याचे महत्त्व वाढतच आहे. (लेखक माजी सोहळा प्रमुख आणि आळंदी देवस्थानचे विश्वस्त आहेत.)
आळंदी व पुणे येथील मुक्काम संपल्यावर सासवड येथील मुक्कामापासून समाज आरतीस प्रारंभ होतो. यावेळी सर्व दिंड्या मानाप्रमाणे गोलाकार उभ्या राहून मध्ये माऊलींची पालखी ठेवलेली असते. यावेळी टाळ-मृदंगाचे आवाज लयीने वाजत राहून चोपदाराची काठी उंच गेली की, ताबडतोब शांतता प्रस्थापित होते. त्याचवेळी हरवलेल्या, सापडलेल्या वस्तूंचा तपशील दिला जातो. गर्दीमुळे चुकलेल्या व्यक्तीची व्यवस्था केली जाते व एका नव्या अनुशासनबद्ध समूहाच्या दर्शनाची सुरुवात होते. येथे जात नाही, धर्म नाही, वय नाही, सर्व आडपडदे हे बाजूला ठेवले जातात. प्रत्येक जण फक्त 'ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज' हाच जयघोष करत पंढरपूरला जात असतात.
माऊलींची पालखी रथामध्ये ठेवून रथापुढे मानाच्या २७ दिंड्या असतात. अग्रभागी जरीपटका घेतलेला घोडेस्वार व माऊलींचा घोडा व रथामागे जवळ जवळ १५०-१७५ दिंड्या. या दिंड्यांमध्ये प्रथा व परंपरेचे जतन केले जाते. प्रत्येक दिंडीत एक वीणा व एक पखवाज व उर्वरित टाळकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या भगिनी असतात. सर्व दिंड्या आळंदीला जमून पालखीचे प्रस्थान होते. सुरुवातीला आळंदीस ५०-६० वारकरी, भाविक भक्तांची गर्दी असते, ती वाढत वाढत पुण्यापर्यंत लाखावर पोहोचते. पुण्याहून सासवडकडे प्रयाण केल्यावर ती दीड लाखावर जाते.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी १२ व्या शतकात विश्वात्मक शांती व कल्याणाचा संदेश समस्त मानवास दिला. वारकरी सांप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज हे गुरुस्थानी असल्याने व त्यांनी सामान्य जनांमध्ये या सांप्रदायाची पोहोच केल्याने सर्वसामान्य समाज हा ज्ञानेश्वरांचे अनुयायीत्व आपोआपच स्वीकारता झाला.
२ पालखी सोहळ्याच्या एकूण १८ दिवसांच्या कालावधीत आर्थिक व सामाजिक अभिसरण इतके सखोल असते की प्रत्येक गावी पालखी मुक्कामाला असताना तेथे होणारे आर्थिक व्यवहार, आठवडे बाजारासारखा असतो. या संबंध पालखी सोहळ्याच्या कालावधीत सुमारे ५ ते साडेसहा कोटींची उलाढाल होते.
प्रत्येक वारकरी हा माऊलींवर असलेल्या श्रद्धेनेच येतो. येथे कोणाला बोलावणे २ लागत नाही. प्रत्येक जण न चुकता दर आषाढी वारीस नियमाने येत असतो व माऊलींच्या सान्निध्यात त्याचे १८ दिवस म्हणजे त्याच्या आयुष्यातील पर्वणी होते.