सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठविली आहे. त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (दि. 14) प्रतिक्विंटल कांद्याला साडेपाच हजारांचा भाव मिळाला आहे. भाव चांगला मिळाल्याने शेतकर्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात चढउतार होत होते. मात्र शनिवारी सर्वाधिक पाच हजार 500 रुपयांचा भाव मिळाला आहे. बाजार समितीमध्ये शनिवारी 17 हजार 456 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. सर्वाधिक दर पाच हजार 500, सरासरी दर 4200, तर सर्वात कमी दर प्रति क्विंटलला 500 रुपये मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीमध्ये व्यापार्यांकडून कांद्याला मागणी वाढली होती. त्यामुळे भाव सातत्याने वाढत होते. मात्र शासनाने अचानक कांद्यावरील निर्यातबंदी हटविल्यामुळे कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यंदाच्या हंगामात कर्नाटकातून नव्या कांद्याची आवकही होत आहे. नगर जिल्ह्यातून जुना कांदा बाजारात विक्रीसाठी येत असल्याचे अडते निहाल वैरागरकर यांनी सांगितले.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा लिलाव रविवार (दि. 15), सोमवार (दि. 16) आणि मंगळवारी (दि. 17) बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकर्यांनी कांदा लिलावासाठी आणू नये, असे आवाहन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे.
येथील बाजार समितीमध्ये पांढर्या कांद्याची आवक होऊ लागली आहे. त्याला चांगला दरही मिळत आहे. निर्यातबंदी उठविल्याचा सकारात्मक परिणाम पांढर्या कांद्याच्या दरावरही झाल्याचे दिसून आले. सोलापूरच्या बाजार समितीमध्ये माळशिरस, अकलूज या भागातून विक्रीसाठी येत आहे.