

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
आम्ही विधानपरिषदेची निवडणूक ही लोकशाही व विचारावर लढत आहोत. सर्वच पक्षाच्या मतदारांना भेटून मत मागत आहोत. विकासावर व जिल्ह्याच्या अस्मितेसाठी आमची लढाई ही महत्त्वाची आहे. अदृश्य शक्ती आमच्या सोबत आहे. मतदारांच्या ताकतीवरच ही निवडणूक लढत असून जिल्ह्याच्या विकासासाठी मतदाराकडे जात आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
खासदार मोहिते-पाटील म्हणाले, सोलापूरचे राजकारण हे आजपर्यंत विकास व विचारांवर झालेले आहे. सध्या सत्ताधाऱ्यांकडून विकासाच्या मुद्द्यावर काहीही बोलले जात नाही. जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री आहेत का पोष्टमन आहेत, हे त्यांनी एकदा जाहीर करावे. ६०० अदृश्य मतदार, आमच्या सोबत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यापूर्वीच आभारही मानले आहे. हे जिल्ह्याला माहिती आहे.
ही निवडणूक स्थानिक सुराज्य मतदारसंघाची आहे. त्यामुळे स्थानिक प्रभागासह गावपातळीवरील विकासावरच विरोधकांनीही बोलावे, ते टाळले जाते. अकलूज हे विचारर्वताचं गाव आहे. येथे प्रत्येकाचे नेहमीच स्वागत केले जाते. पाशवी मतदार संख्या असूनही ते का घाबरतात. विरोधकांचा त्यांच्या मतदारांवर विश्वास राहिला नाही. हेच यातून सिद्ध होत आहे. मोहिते-पाटील उमेदवार नसले तरीही मोहिते-पाटलांवर आरोप होतो.
प्रत्येक मतदारांना आम्ही भेटून निवडणूक का लढवतो, हे पटवून देत आहोत. निवडणूक कोणतीही असो मोहिते-पाटील उमेदवार नसले तरीही मोहिते-पाटलांवर आरोप केला जातो. या जिल्ह्यातील जनतेने मोहिते-पाटलांना उमे केल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. जे संपलेले आहेत त्यांच्याविषयी बोलणे योग्य होणार नाही, असेही एका प्रश्नाच्या उत्तरादाखल खा, मोहिते-पाटील यांनी उत्तर दिले. आ. उत्तमराव जानकरांनी व्यक्त केलेल्या नाराजीविषयी विचारले असता, मिटलं का नाही ते लवकरच दिसणार असल्याचेही त्यांनी सांगितले.