

सोलापूर : मुलांना साधारणपणे पालकांकडून अनुवंशिकतेने चष्मा येतो. एका जरी पालकाला चष्मा असेल, तरी चष्मा लागण्याची खूप शक्यता असते. याशिवाय पोषक तत्वांची कमतरता आणि स्क्रीन टाईम वाढल्याचाही हा परिणाम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
काहीवेळा पालकांना किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला चष्मा नसतानाही मुलांना चष्मा असतो. त्यामुळे चष्मा लागण्यात अनुवंशिकता हे एकच कारण असते, असे नाही. मूल खूप वेळ टीव्ही पाहत असल्याचा परिणाम म्हणून तसेच रोजच्या आहारात गाजर, इतर पौष्टिक जीवनसत्वे असलेल्या पालेभाज्या खात नसल्याने चष्मा लागू शकतो. मोबाईल, टॅबलेट, टीव्ही आणि सतत स्क्रीनसमोर घालवला जाणारा वेळ, तसेच मैदानी खेळ आणि नैसर्गिक प्रकाशात कमी जाणे, ही यामागची महत्त्वाची कारणे असू शकतात.
लहान वयातच मोबाईल मिळाल्याचे दुष्परिणाम सामोरे येत आहेत. या वयात दूरचे स्पष्ट न दिसण्याची समस्या उद्भवते. प्रत्येक चार मुलामागे एकाला म्हणजे २५ टक्के मुलांमध्ये चष्मा लागत आहे. ही स्थिती: वाढत्या डिजिटलायझेशनमुळे वाढली आहे. तासनतास मोबाईल किंवा कॉम्प्युटर स्क्रीन पाहणे, आणि मैदानी खेळ कमी झाल्यामुळे नैसर्गिक सूर्यप्रकाश न मिळाल्यानेही चष्मा लागण्याची शक्यता वाढते.
हे उपायही रोज करावेत
दर एक तासाला डोळयांना आराम द्यावा.
तासाभराने दूर अंतरावर पहावे.
डोळ्यांची कायम उघडझाप करावी.
थंड पाण्याने डोळे दिवसातून तीनवेळा धुवावे.