करमाळा: पुढारी वृत्तसेवा : करमाळा नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम उर्फ दादा राखुंडे (वय ८०, रा. कानड गल्ली, करमाळा) यांनी मराठा आरक्षणासाठी शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी चिट्टीद्वारे करत राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. आज (दि.२३) सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मराठा आरक्षण मिळावे व आपला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा आहे, असे पत्र लिहिलेले सापडले. बलभीम राखुंडे हे पूर्वीपासूनच मराठा समाजाच्या चळवळीत सक्रिय होते. ते अनेक आंदोलने, मोर्चे यामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी वेळोवेळी राजकारणात या कारणास्तव बंड केले होते. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून ते अलीकडे निराश होते.
त्यांनी लिहिलेल्या चिट्टीमध्ये मराठा आरक्षण मिळत नाही, म्हणून आपण जीवन संपवत असल्याचे नमूद केले आहे. याबाबत कोणीही तक्रार करू नये, असा ही उल्लेख केला आहे. मराठा आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांना पाठिंबा असल्याचेही त्यांनी लिहिले आहे. करमाळा शहर व तालुक्यात शोककळा पसरली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.