

सोलापूर : शहर जिल्ह्यातील मधुमेहाने बाधित रुग्णांनी यंदाच्या पावसाळ्यात आपल्या पायांच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पायाला सतत मुंग्या येत असतील किंवा एखादी छोटी जखम बरेच दिवस भरून येत नसेल. तर ही जखम डायबेटिक फूट (Diabetic Foot) या गंभीर स्वरूपाच्या आजाराचे लक्षण असू शकते. त्यामुळे मधुमेहींनी किरकोळ जखम किंवा मुंग्या येण्याकडे दुर्लक्ष केल्यास महागात पडू शकते.
रक्तातील साखर दीर्घकाळ नियंत्रणात असणे आवश्यक आहे. ती जर सतत अनियंत्रितच राहिली तर पायातील नसा व रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. म्हणूनच अशा रुग्णांनी पायाला सतत मुंग्या येत असतील व एखादी बारीक जखम बरेच दिवस भरून येत नसेल तर तो डायबेटिक फूट (Diabetic Foot) या गंभीर स्वरूपाचा आजार ठरू शकतो. म्हणून मधुमेहींच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवावी. मधुमेहामुळे पायासह शरीरात होणाऱ्या अन्य बदलांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या बदलांकडे दुर्लक्ष करून घरगुती उपचार करत असल्यास ते रुग्णाला महागात पडू शकते.
रक्तातील साखर नियंत्रित राहत नसेल. तर अशा मधुमेही रुग्णांनी वेळीच तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्या तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विविध प्रकारच्या तपासण्या करून वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे. दुर्लक्ष केल्यास पाय कापण्याचीही वेळ या रुग्णांवर येऊ शकते किंवा ती जीवावरही बेतू शकते.