सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर शहरात बेपत्ता होण्याचे प्रमाण मधल्या काही काळात कमी झाले होते; पण आता पुन्हा एकाच कुुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांची दोन मुले एकदम बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस प्रशासनाने त्याबाबत माहिती दिली आहे. निरंजन भीमाशंकर क्षीरसागर (वय 39, रा. मोट्याळ, ता. अक्कलकोट) यांनी एमआयडीसी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे. निरंजन हे बेपत्ता असलेल्या रघुनाथ यांचे बंधू आहेत.
रघुनाथ भीमाशंकर क्षीरसागर (वय 30, रा. मोट्याळ, ता. अक्कलकोट), पत्नी अंकिता रघुनाथ क्षीरसागर (वय 22), मुलगा भीमाशंकर (वय 3) व मुलगी खुशी (वय 4) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण 15 जूनला गणेशनगर, मुळेगाव रोड, सोलापूर येथून सकाळी साडेसात वाजता निघून गेले ते आलेच नाहीत. ते बेपत्ता झाले आहेत. हे सर्वजण आढळल्यास एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुळेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे राहात असलेल्या साडूकडे ते भेटायला आले होते, अशी माहिती आहे.