Mahatma Gandhi Death Anniversary : बापूंची १९२१ मध्ये झाली होती सोलापुरात सभा; विठ्ठलाचे घेतले होते दर्शन | पुढारी

Mahatma Gandhi Death Anniversary : बापूंची १९२१ मध्ये झाली होती सोलापुरात सभा; विठ्ठलाचे घेतले होते दर्शन

सोलापूर : जगन्नाथ हुक्केरी : महात्मा गांधी म्हणजे, सगळ्यांचे लाडके बापू. त्यांचा व सोलापूरच्या स्वातंत्र्य चळवळीचा जवळचा संबंध होता. त्यांच्याच आव्हानाला प्रतिसाद देत पाच हुतात्म्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली होती. 1921 आणि 1927 साली असे दोन वेळा गांधीजी सोलापूर जिल्ह्यात येऊन गेले. 26 मे 1921 रोजी गांधीजींची सोलापुरात फार मोठी सभा झाली होती. (Mahatma Gandhi Death Anniversary)

मोठ्या सभेच्या अध्यक्षस्थानी शेठ हिराचंद नेमचंद होते. याच सभेत त्यांना त्यावेळच्या सोलापूर नगरपालिकेच्या वतीने मानपत्र देऊन गौरव करण्यात आला होता. 19 ते 21 फेब्रुवारी 1927 मध्ये महात्मा गांधीजी व कस्तुरबा गांधी यांचा संभाजी तलावाजवळील मोतीबाग विश्रामगृहात तीन दिवस मुक्काम होता. त्याचवेळी महात्मा गांधीजी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेले होते. तेव्हा त्यांच्या चपला चोरीस गेल्या होत्या; पण त्यांच्या त्या चपला सापडल्या नाहीत. दरम्यान, दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगलाही त्यांनी भेट दिली. तेथील श्री शंकरलिंग मैदानासमोर ते बसले होते. मेलकेरी यांच्या घरी त्यांनी आरामही केला होता. त्यांचा तो पलंग आजही त्यांनी जतन करून ठेवला आहे. (Mahatma Gandhi Death Anniversary)

बंदी असतानाही वळसंगमध्ये भाषण

ब्रिटिश सरकारने सार्वजनिक ठिकाणी भाषण करण्यावर बंदी घातली होती. तरीही बापूजींनी वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथील श्री शंकरलिंग मैदानावर सभा घेतली. राचप्पा मेलकेरी यांच्या वाड्यात त्यांनी गुप्त बैठक घेतली होती. स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित पत्रके वाटली होती. गांधीजींच्या भाषणापासून प्रेरणा घेऊन वळसंगचे पहिले सरपंच राचप्पा मेलकेरी, वीरभद्रप्पा कोंडे, गुरुसिद्धप्पा आंटद, रामण्णा हुल्ले, कै. तडलगी, मल्लप्पा धनशेट्टी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली होती. ब्रिटिशांनी अनेकांना अटकही केली होती. (Mahatma Gandhi Death Anniversary)

Back to top button