

बार्शी; पुढारी वृत्तसेवा : एस.टी. बस व दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून, आणखी आठ ते दहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात बार्शी-धाराशिव मार्गावरील तांदूळवाडी शिवारात घडला. अपघातातील मृत हे धाराशिव येथील पाथृड गल्लीतील आहेत.
कार्तिक रोहित यादव (वय 17, रा.जोरे गल्ली, धाराशिव), ओंकार अनिल पवार (20), ओम दत्ता आतकरे (22, दोघेही रा. शिंगोली, ता. जि. धाराशिव) अशी या अपघातातील मयतांची नावे आहेत. तर नंदिनी मधुकर कांबळे, कलावती तुकाराम कसबे अशी बसमधील
गंभीर जखमी महिलांची नावे आहेत.
धाराशिव येथील तिघे मित्र दुचाकीवरून धाराशिव येथून बार्शीत हळदी कार्यक्रमासाठी येत होते. तांदुळवाडी शिवारात पुण्याहून धाराशिवकडे निघालेल्या बस व या दुचाकीची जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातात दुचाकीवरील दोघे तरुण बसच्या पुढच्या भागात खाली गाडीसह अडकूनच राहिले होते. ते क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. तर एकाचे शीर धडापासून वेगळे झाले होते. दुचाकीवरील तिघेही जागेवरच मयत झाले. अपघातानंतर एसटी बस रस्त्याच्या बाजुला जाऊन पलटी झाली. बसमधील दोन महिला प्रवासी गंभीर तर आणखी आठ ते दहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एसटी बसचे चालक, वाहक व अनेक प्रवाशांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच पांगरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे व स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पांगरी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवले. जखमींमध्ये एसटी बसचे चालक, वाहक व अनेक प्रवाशांचा समावेश आहे. जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बार्शी व सोलापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पांगरी पोलिस अधिक तपास करत आहेत.