![सोलापूर : कोट्यवधींची उलाढाल; मात्र रस्त्यांची लागली वाट](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F06%2FUntitled-design-2023-06-26T222232.291.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि शेतकर्यांच्या शेतीमालामुळे नावारूपाला आलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या रस्त्याची चांगलीच वाट लागली आहे. पहिल्याच पावसात बाजार समितीमधील अनेक रस्ते चिखलात माखले आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचून दुर्गंधी सुटली आहे.
बाजार समितीची वार्षिक उलाढाल आता एक हजार कोटींच्या पुढे गेली आहे. याठिकाणी अनेक ठिकाणांहून शेतकरी आपला शेती माल घेऊन येतात. मात्र, त्यांना येण्यासाठी आणि अडत व्यापार्यांच्या दुकानापर्यंत जाण्यासाठी रस्ते नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागतो. बाजार समितीमधील अनेक रस्ते चिखल, मातीने माखले आहेत. काहीवेळा शेतकर्यांचा विक्री न झालेला माल काही दिवस बाजार समिती परिसरातच पडून असतो. त्यावर पावसाचे पाणी पडून दुर्गंधी सुटते. खराब माल झाल्याने शेतकर्यांना नुकसान सोसावे लागते. समितीने तातडीने याकडे लक्ष द्यावे आणि रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.
प्रशासकीय इमारत आणि सभापती, उपसभापती यांची दालने टकाटक आहेत. शेतकर्यांना मात्र अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. बाजार समिती प्रशासनाने तातडीने शेतकर्यांच्या समस्या सोडवाव्यात.
– सोमनाथ भोसले, शेतकरी