![कोण पार्सल, कोण किती वर्षाचं, हे निपाणीत सांगतो : शरद पवारांचे फडणवीसांच्या टीकेला उत्तर](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F06%2F%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोलापूर: पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात केवळ साडेतीन जिल्ह्यापुरता मर्यादित असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काय करणार ? , हे पार्सल पुन्हा महाराष्ट्रात पाठवून द्या, आम्ही त्याचं काय करायचं ते बघून घेऊ, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकात प्रचारादरम्यान केली होती. या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. मी आज निपाणीला चाललो आहे. त्यामुळे कोण पार्सल आहे, कोण किती वर्षाचं आहे, या सगळ्यावर निपाणीत सविस्तरपणे बोलेन, असे पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर असून आज (दि. ८) सकाळी हॉटेल बालाजी सरोवर येथे पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला निपाणीत जाऊन उत्तर देऊ, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला. राज्यातील सरकार टिकेल किंवा नाही, याविषयी विचारल्यास पवार म्हणाले, कोर्टाचा निर्णय अद्याप आलेला नाही. निर्णय काय होईल, यासाठी वाट पहावी लागेल. 'सामना' मध्ये काय लिहिले आहे, हे मी वाचलेले नाही, असेही पवार यांनी सामनामधून केलेल्या टीकेवर उत्तर दिले.
महाराष्ट्र राज्यातील एकूणच वातावरण पाहता महाविकास आघाडीमध्ये सध्या काय चाललंय ? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, तुम्ही काही काळजी करू नका, महाविकास आघाडीमध्ये सर्व काही ठीक आहे, असे सांगितले.
कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. राजीनामा देऊन पक्षाची संघटनात्मक बांधणी करायचा असा माझा विचार होता. पण तो माझा गैरसमज होता. आता जे झाले त्याचा आनंद आहे. आता कामाला सुरुवात केली आहे.
हेही वाचा