सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भरणार्या यात्रेसाठी सोलापूर विभागाने जादा बस गाड्यांचे नियोजन केले आहे. एकादशीसाठी पंढरपूरला जाणार्या भाविकांसाठी 1 नोव्हेंबरपासून रोज जादा गाड्या सोडल्या जात आहेत. सोलापूर विभागातील नऊ डेपोतून 152 जादा गाड्या सोडण्याचे नियोजन एसटीने केले आहे. 8 नोव्हेंबरपर्यंत ही जादा वाहतूक सुरू राहणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
महाराष्ट्रसह इतर राज्यातील लाखो भाविक दरवर्षी वारीमध्ये सहभागी होतात. यंदा देखील कार्तिकीवारीच्या निमित्ताने लाखो भाविक पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून जाणार्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या भाविकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.
मंगळवारपासून (दि. 1) बसस्थानकांतून जादा गाड्या सोडल्या जात आहेत. शहरातील मुख्य बसस्थानकांतून जादा वाहतुकीची व्यवस्था केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सोलापूर मुख्य आगार 31, पंढरपूर 14, बार्शी 36, अक्कलकोट 8, करमाळा 17, अकलूज 13, सांगोला 7, कुरूडवाडी 12 व मंगळवेढा डेपोतून 14 जादा बसेस सोडण्याचे नियोजन एसटीने केले आहे.