सोलापूर : राज्यातील 76 मीटर रीडिंग एजन्सी बडतर्फ | पुढारी

सोलापूर : राज्यातील 76 मीटर रीडिंग एजन्सी बडतर्फ

सोलापूर : संतोष सिरसट :  मीटर रीडिंगमध्ये हयगय करणार्‍या एजन्सींच्या कामांचे मूल्यांकन करीत त्यांच्यावर धडक कारवाईचा बडगा महावितरणने उगारला आहे. राज्यातील तब्बल 76 मीटर रीडिंग एजन्सींना बडतर्फ करण्यात आले. महावितरणच्या 41 अभियंत्यांना कारणेदाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे अस्पष्ट फोटोंचे प्रमाण 45 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात महावितरणला यश आले आहे.

चुकीच्या वीज बिलांमुळे ग्राहकांना होणारा नाहक मन:स्ताप व वीज बिल दुरुस्तीच्या त्रासासोबतच महावितरणच्या महसूलचे नुकसान लक्षात घेत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी राबविलेल्या विशेष प्रयत्नांमुळे महावितरणच्या वीज बिलांतील अचूकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

एप्रिल ते जून या 3 महिन्यांत वीज विक्रीतही तब्बल 3 टक्क्यांनी (825 दशलक्ष युनिट) वाढ झाली आहे. उत्कृष्ट ग्राहकसेवा व महसूल यांना महावितरणचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीज मीटरचे रीडिंग अचूकच झाले पाहिजे. मीटर रिडिंगमधील अचूकतेसाठी महावितरणने अतिशय गांभीर्याने धडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. सिंघल यांच्या मार्गदर्शनात अचूक रीडिंगसाठी सुधारणा न करणे, वीज मीटर योग्य स्थितीत असूनही हेतुपुरस्सरपणे नादुरुस्तीचा (फॉल्टी) शेरा देणे, सरासरी किंवा चुकीचे रिडिंग घेणे याप्रकारे मीटर रिडिंगमध्ये हयगय करणार्‍या मीटर रीडिंग एजन्सींविरुद्ध तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकार्‍यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू करीत महावितरणकडून प्रामुख्याने उत्कृष्ट ग्राहकसेवा व महसूलवाढीसह सक्षमतेचा, प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी आमूलाग्र सुधारणा सुरू आहेत.

त्यात कोणतीही तडजोड होणार नाही. ग्राहकांनी प्रत्यक्षात वापरलेल्या विजेचे अचूक बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. वारंवार सूचना देऊनही एजन्सींनी रिडिंगमधील हेतुपुरस्सर चुका किंवा सततचे दोष टाळले नाहीत तर एजन्सींविरुद्ध बडतर्फी व काळ्या यादीत टाकण्यासह प्रसंगी फौजदारी कारवाई करण्याची समजदेखील या एजन्सींना देण्यात आली आहे.

मीटर रीडिंग अचूक, गुणवत्तेनुसार
सदोष व चुकीच्या रीडिंगमुळे ग्राहकांचा रोष वाढतो. त्यामुळे अचूक बिलिंगसाठी 100 टक्के अचूक रीडिंग हे महावितरणचे लक्ष्य आहे. त्यासाठी सुरू असलेल्या उपायांमुळे बिलिंग व रीडिंगमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. मीटर रीडिंग हे अचूक व गुणवत्तेनुसार होईल, यासाठी कायम काळजी घेण्यात येईल.

वीजहानीचा भुर्दंड कमी होणार
अचूक मीटर रीडिंगमुळे महावितरणच्या महसुलासोबतच वीज वितरण हानीतदेखील मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्याचा प्रत्यक्ष लाभ थेट वीज ग्राहकांना होणार आहे. वीजहानीपोटी त्यांना बसणारा आर्थिक भुर्दंडदेखील कमी होणार आहे. याशिवाय वीज बिलासंदर्भात ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाणदेखील कमी होणार आहे.

Back to top button