पंढरपूर : एम.आय.डी.सी. साकार होणे ही काळाजी गरज | पुढारी

पंढरपूर : एम.आय.डी.सी. साकार होणे ही काळाजी गरज

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा :  गेली अनेक वर्षे पंढरपूर तालुक्यातील राजकीय व व्यावसायिकदृष्ट्या कळीचा मुद्दा म्हणून गाजणार्‍या एम.आय.डी.सी. या औद्योगिक हबचे साकार होणे ही काळाजी असल्याचे प्रतिपादन पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे. पंढरपूर तालुक्यातील आर्थिक व रोजगार बाबींना व्यापक रूप देण्यासाठी या तालुक्यात लवकरात लवकर एम.आय. डी.सी. मंजूर होणे गरजेचे असल्याचे पत्र आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिले आहे.

या पत्रामध्ये आ. आवताडे यांनी म्हटले आहे की, पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर हे भारताचे दक्षिण काशी म्हणून संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्थान व उभ्या महाराष्ट्राचे श्री विठ्ठल आराध्य दैवत आहे. श्री विठ्ठलावर असणार्‍या श्रद्धेपोटी दरवर्षी लाखो वारकरी भाविक हे चैत्री, आषाढी, कार्तिकी, माघी या यात्रांसाठी वारी रूपामध्ये पंढरपूर शहरामध्ये दाखल होतात. पंढरपूरची ही वारी फक्त महाराष्ट्र राज्यापर्यंत मर्यादित न राहता या वैष्णव सोहळ्यासाठी कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून एक कोटीपेक्षा अधिक वारकरी भाविक जमा होतात. श्रीक्षेत्र पंढरपूरच्या शेजारी कासेगाव, लक्ष्मीटाकळी, वाखरी, गोपाळपूर, ही निमशहरी म्हणून गावे वसलेली आहेत. पंढरपूर शहर व 4 निमशहरी गावांची लोकसंख्या 2 लाख आहे. एवढे मोठे प्रादेशिक आणि लोकसंख्या क्षेत्र असणार्‍या गावातील अनेक युवक हे रोजगारानिमित्त राज्यातील व परराज्यांतील शहराकडे विस्थापित होत आहेत.

महाराष्ट्र राज्यातून प्रत्येक तालुक्यातून, जिल्ह्यातून एस.टी., रेल्वे, खासगी वाहनांनी अनेक लोक पंढरपूर येथे येत असतात. पंढरपूर शहराला जोडणारे पालखीमार्ग, राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग झालेले आहेत. शिक्षण व उच्च शिक्षणाच्यादृष्टीने पंढरपूर शहर हे नावारूपास आलेले अग्रगण्य शहर आहे. सध्याच्या काळामध्ये पंढरपूर तालुक्यात 4 अभियांत्रिकी कॉलेज, विविध पदवी महाविद्यालये, अनेक विद्यालये आहेत.

या ज्ञानसंकुलांमध्ये शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी दरवर्षी निरनिराळ्या पदव्या संपादन करत आहेत. कीर्तीमान गुणवत्ता आणि आवश्यक पात्रता असूनसुद्धा केवळ अपुर्‍या रोजगार संधी असल्यामुळे हे अनेक विद्यार्थी बाहेर पडून नोकरीची संधी शोधत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम येथील समाजजीवनावर आणि अर्थकारण यावर होताना दिसून येत आहे. सध्याच्या काळामध्ये वाढत जाणारी बेरोजगारी आणि शासकीय नोकर्‍यांचे असणारे दुर्मीळ प्रमाण याच्यामधून सुवर्णमध्य काढण्यासाठी ही एम.आय.डी.सी. स्थापन होणे अतिशय गरजेचे असल्याचे मत आ. आवताडे यांनी उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे मांडले आहे.

पंढरपूर तालुक्याचा एकूणात्मक आपल्या संपूर्ण मतदारसंघाच्या धोरणात्मक विकासासाठी नेहमीच आपल्या नेतृत्व कौशल्याचा आणि विधायक कार्याचा अट्टाहास करणारे आ. आवताडे यांच्या अथक प्रयत्नांतून आणि नव्याने स्थापन झालेल्या शिंदे – फडणवीस सरकारच्या सहकार्यातून ही एम.आय.डी.सी. साकार होण्याच्या जनतेच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.

आ. आवताडे यांचा पाठपुरावा सुरू
तालुक्यातील अर्थचक्र गतिमान करण्यासाठी एम.आय.डी.सी. स्थापन व्हावी यासाठी आ. आवताडे हे अगदी सुरुवातीपासूनच आग्रही आणि प्रयत्नशील आहेत. यापूर्वी म्हणजेच 9 नोव्हेंबर 2021 रोजी मागणी करणारे पत्र आ. आवताडे यांनी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनाही दिले होते.

Back to top button