सांगोला : पुढारी वृत्तसेवा :
राज्य शासनाद्वारे 16 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत पृथ्वी, वायू,जल,अग्नी, आकाश या पंच तत्त्वांवर आधारित 'माझी वसुंधरा' अभियान हे शासनाचे महत्त्वाकांक्षी अभियान राज्यभर अमृत शहरे, नगरपरिषदा, नगरपंचायती, ग्रामपंचायती स्तरावर राबविण्यात आले. यामध्ये राज्यातील एकूण 226 नगरपरिषदांच्या गटामध्ये सांगोला नगरपरिषदेने राज्यात 6 वा क्रमांक पटकावला आहे.
राज्य शासनाद्वारे पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल, पर्यावरणाची होत असणारी हानी रोखण्यासाठी 'माझी वसुंधरा' अभियान सुरू करण्यात आले. या अभियानात सांगोला नगरपरिषददेखील या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. या अभियानात सांगोला नगरपरिषदेमार्फत वसुंधरा लीग, वसुंधरा फेस्ट, सायकल रॅली, इ बाईक रॅली, शहरातील शाळा व महाविद्यालये यामध्ये पर्यावरणासंबंधी विविध स्पर्धांचे आयोजन, वसुंधरा दूतांच्या निवडी यांसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांमध्ये मोठ्या जनजागृती करण्यात आली.
त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संगोपन, स्वतः च्या मालकीची 14000 वृक्ष क्षमतेच्या नर्सरीची निर्मिती, शहरातील अतिक्रमण करण्यात आलेल्या शासकीय जमिनीवर हरित पट्टे निर्मिती करण्यात आली. शहरातील विविध भागांमधील हवेचे दरमहा हवा परीक्षण, घनकचरा व्यवस्थापन, विहिरींचे पुनर्भरण, सौदर्यीकरण, जलप्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य ते निसर्ग उपक्रम, सर्व शासकीय इमारतीमधील पाणी व ऊर्जा परीक्षण, सर्व सार्वजनिक इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले. तसेच शहरातील नागरिकांमध्ये पाणीबचत, विजबचत ई – कचरा विलीगीकरण, फटाकेबंदी व पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्यास प्रोत्साहन यासारख्या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.
हे यश प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजीक संस्था, पत्रकार बंधू-भगिनी, सुजाण नागरिक, शाळा-कॉलेज चे गुरुजन वर्ग, विद्यार्थी अशा सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ आहे.माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरात सुरू झालेली पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ यपुढे आणखी प्रभावी करण्याचा मानस आहे.