राष्ट्रवादीच्या योजनेला शिवसेनेचा विरोध | पुढारी

राष्ट्रवादीच्या योजनेला शिवसेनेचा विरोध

करमाळा : पुढारी वृत्तसेवा :  इंदापूरचे आमदार तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पुढे करून इंदापूर व बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेला खूश करण्यासाठी राष्ट्रवादीचे खा. सुप्रिया सुळे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘लाकडी-निंबोडी उपसासिंचन’ योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या योजनेला करमाळा तालुक्यातील शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी योजनेस आव्हान देत तीव्र विरोध केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की, करमाळा तालुक्यातील अनेक गावांनी आपल्या घर, शेतजमीन व गावांचा त्याग केल्यानंतर उजनी धरणाची निर्मिती झाली. आज उजनी धरणाच्या पाण्यावर पहिला अधिकार हा प्रकल्पग्रस्तांचा असून, त्यांच्या भावना वा मत विचारात न घेता आज उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन केले जात आहे. उजनी धरणातून पाणी उपसा करुन ‘लाकडी-निंबोडी उपसासिंचन’ योजना मंजूर करुन पाणी पळविण्याचा हा गंभीर प्रकार असल्याचा आरोप माजी आमदार नारायण पाटील यांनी केला आहे.

आता प्रत्यक्षात उजनी धरणासाठी त्याग केलेल्या धरणग्रस्तांची व्यथा त्यांच्या गावात जाऊन आपण जाणून घेणार असून उजनीच्या भविष्यातील सुस्थितीतील अस्तित्वासाठी आपण शेतकर्‍यांना या नियोजनात सहभागी करुन घेणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी करमाळ्याचे राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार संजयमामा शिंदे यांच्यावरदेखील हल्लाबोल केला. आमदारांनी करमाळा तालुक्यातील धरणग्रस्तांची फसवणूक केली असून याचे गंभीर परिणाम धरणग्रस्तांना दीर्घकाळ भोगावे लागणार आहेत. आमदार संजयमामा शिंदे यांची दुटप्पी भूमिका उजनी पाणी परिषदेच्या माध्यमातून नारायण पाटील जनतेसमोर उघडी करणार असल्याचे बोलले जात आहे.

उजनी पाणी परिषदेच्या माध्यमातून उजनीकाठच्या दहा गावांमध्ये प्रत्यक्ष धरणग्रस्तांचे मत जाणून घेणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. उजनी पाणी परिषदेचा हा नियोजित कार्यक्रम गुरूवार, 26 मेपासून सुरू झाला असून 6 जूनपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. 26 मे रोजी (वांगी नं. 3) येथे उजनी परिषद झाली. 27 मे (उमरड), 28 मे (कंदर), 29 मे (चिखलठाण 1), 30 मे (शेलगाव-वांगी), 31 मे (वाशिंबे), 1 जून (केतुर 2), 2 जून (टाकळी), 3 जून (कोंढारचिंचोली), 4 जून (जिंती) अशाठिकाणी माजी आमदार नारायण पाटील यांच्या जाहीर सभांचे नियोजन करण्यात आले आहे. या सभा रात्री सात वाजता होणार आहेत. सभेच्या ठिकाणी आसपासच्या गावांतील शेतकरी व प्रकल्पग्रस्तांना आमंत्रित करण्यात येणार आहे.

6 जून रोजी जेऊर येथे पत्रकारांशी संवाद साधून माजी आमदार नारायण पाटील हे धरणग्रस्तांच्या वतीने आपली भूमिका एका पत्रकार परिषदेत मांडणार आहेत. या उजनी परिषदेत धरणग्रस्त व शेतकरी यांना सहभागी होण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष प्रा. डॉ. संजय चौधरी व प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले आहे.

Back to top button