पोषण आहाराबाबत पालकांचा मुंबईत उपोषणाचा इशारा

पोषण आहाराबाबत पालकांचा मुंबईत उपोषणाचा इशारा
Published on
Updated on

बार्शी : गणेश गोडसे :  बार्शी शहर व तालुक्यातील शालेय पोषण आहाराचा कारभार दै. 'पुढारी'ने वस्तुनिष्ठ व सडेतोड स्वरुपात वृत्त मालिकेच्या माध्यमातून उजेडात आणला आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार्‍या संबंधित यंत्रणेकडून शालेय पोषण आहाराच्या प्रक्रियेबाबत काळजी घेणे गरजेचे असल्याचा सूर पालक, जनतेसह चक्क प्रशासकीय पातळीवरुनही उमटताना दिसत आहे. पालकांसह जनतेकडूनही यादृष्टीने हालचाली गतिमान झाल्या असून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याचा निर्णयही तालुक्यातील पालकांच्या वतीने घेण्यात आला आहे.

शालेय पोषण आहार प्रक्रियेतील अधिकारी, मुख्याध्यापक यांनी मनात आणल्यास अशा पद्धतीचा निकृष्ट व दर्जाहीन आहार खाण्याची वेळ तालुक्यातील बालकांवर येणारच नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून कामकाज करणे व बालकांच्या जीवाची काळजी घेणे काळाची गरज असल्याचे ठरू पाहात आहे. बार्शी तालुक्यात वितरित करण्यात आलेला खराब शालेय पोषण आहार उतरून घेण्यासाठी तालुका पंचायत समिती प्रशासन, तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक व या यंत्रणेमधील इतर लोक यांच्यावर कोणाचा दबाव आहे का?

प्रशासनाला, ठेकेदाराला विरोध नको म्हणून सर्वच मूग गिळून गप्प बसले जातात का, याचीही चौकशी वरिष्ठ स्तरावरून होणे आवश्यक असल्याचे पालकांमधून बोलले जात आहे. पालकांसह प्रशासकीय अधिकारी व त्या-त्या गावातील स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधींकडून याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तरच बालकांच्या घशातील हक्काचा घास हिरावला जाणार नाही. नाहीतर प्रशासकीय पातळीवरून हा विषय किती गांभीर्याने घेतला जाईल, हा संशोधनाचा विषय ठरेल. भेसळीसंदर्भात अन्न भेसळ विभाग याबाबत कोणती भूमिका घेणार का वाटप शालेय पोषण आहार उत्कृष्ट प्रतीचा असल्याचे प्रमाणपत्र देऊन सर्वसामान्य तक्रारदारांच्या तोंडाला पाने पुसून सारवासारव करणार, हे लवकरच समोर येणार आहे. नाव न छापण्याच्या अटीवर एका महिलेने सांगितले की, निकृष्ट शालेय पोषण आहाराबाबत मी आवाज उठवला असता जिथे चांगला आहार मिळतो त्या शाळेत तुमच्या पाल्यास टाका, असे म्हणून प्रवेशाबाबत अडचण निर्माण केल्याचे सांगण्यात आले.

बार्शी तालुक्यात निकृष्ट, सडका व उंदराच्या लेंड्या असणारा शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला असून संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करावी. लवकरच याबाबत मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाबाबतचे निवेदन देणार आहे.
– रवींद्र मुठाळ, तक्रारदार

आम्हाला वाटप केलेला शालेय पोषण आहार हा जनावरे खाण्याच्या प्रतीचासुद्धा नसल्यामुळे आम्हाला तो घंटागाडीत टाकून द्यावा लागला. आहारात भुंगे व किडेही होते.दर्जाहीन आहार वाटप करून आमची क्रूर चेष्टा केली आहे.
– राजगोपाल मालू, पालक

तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना लेखी पत्र काढले असून आहाराची प्रत पाहून, मोजणी करून, शाळेची मंजुरी बघूनच माल उतरून घ्यावा. असे पत्र देऊनही त्यांनी खराब माल उतरून का घेतला?
– लक्ष्मीकांत जाधव, प्रभारी गटशिक्षण अधिकारी, बार्शी पं.स.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news