सातारा : टाळ-मृदुंगा संगे… गेले रिंगण रंगुनी…

सातारा : टाळ-मृदुंगा संगे… गेले रिंगण रंगुनी…
Published on
Updated on

तरडगाव : नवनाथ गोवेकर
चांदोबाचा लिंब येथे माऊली माऊली… आणि हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील उभे रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवताना भाविक वारकर्‍यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. वारीच्या वाटेवरील हे पहिले रिंगण उदंड उत्साहात पार पडले. अश्‍व धावे अश्‍वामागे। अवघा सोहळा पहावा डोळे भरूनी। वैष्णव उभे रिंगणी। टाळ, मृदुंगा संगे। गेले रिंगण रंगुनी॥ या काव्यरचनेचा प्रत्यय आणून देणार्‍या या सोहळ्यात टाळ-मृदंगांचा गजर अन् विठ्ठलनामाचा जयघोष झाला.
भान हरपून खेळ खेळतो ।
दंगतो भक्‍तीत वैष्णवांचा मेळा ॥
भक्‍तीने भारलेला रिंगण सोहळा ।
पाहावा याचि देही याचि डोळा ॥
आळंदी-पंढरपूर वारीतील विशेष महत्त्व असलेला रिंगण सोहळा यावर्षी वारकर्‍यांसाठी वारीचा आनंद द्विगुणीत करणारा ठरला. एक नवी ऊर्जा यातून वारकर्‍यांना पुढील वारीसाठी मिळाली. कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे हा सोहळा झाला नव्हता. त्यामुळे यंदा रिंगण पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी सोहळ्यात झाली होती. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी लाखो वैष्णवांची गर्दी झाली होती. पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. रिंगण कालावधीत सोहळ्यातील वाहनांना वाहतुकीस अडथळा येऊ नये यासाठी महामार्गाचे रुंदीकरण करुन स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.

वारकर्‍यांचा उत्साह आणि टाळ मृदुंगाच्या टिपेला पोहचलेल्या स्वरात रिंगण पार पडले. माऊली… माऊली…आणि ग्यानबा… तुकाराम… च्या जयघोष वारकर्‍यांनी वारीतील पहिले उभे रिंगण पाहताना आध्यात्मिक मेजवानीचा आनंद लुटला. भक्ती, शिस्त आणि अनुशासनाचा मूर्तीमंत सोहळा या रिंगणावेळी अनुभवायला मिळला. माऊलींचा पालखी सोहळा लोणंद येथे मंगळवारी सायंकाळपासून अडीच दिवसांसाठी विसावला होता. गुरुवारी दुपारी महाआरती व नैवेद्य झाल्यावर माऊलींचा पालखी सोहळा तरडगावकडे निघाला. दुपारी चारच्या सुमारास पालखी सोहळ्याने खंडाळा तालुक्याचा निरोप घेऊन सरदेचा ओढा ओलांडून फलटण तालुक्यात प्रवेश केला. केवळ आठ किलोमीटरचे सर्वांत छोटे अंतर असलेला हा टप्पा आहे. चांदोबाचा लिंब याठिकाणी प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. मंदिराची रंगरंगोटी करुन फुलांची सजावट करण्यात आली होती. चांदोबाचा लिंब परिसरात माऊलींचा चांदीचा रथ पोहचल्यावर सर्व दिंड्या आहे त्या जागी थांबवण्यात आल्या. सर्व दिंड्यातील वारकर्‍यांनी दोन्ही बाजूने उभे राहत रिंगणासाठी माऊलींचा जयघोष सुरु केला. चोपदारांनी उभे रिंगण करण्यासाठी जागा पाहणी केल्यावर पालखी सोहळ्यापुढे असणारे दोन अश्‍व. ज्यात एकावर स्वत: माऊली स्वार असतात तर दुसरा शितोळे सरकारांचा आळंदी संस्थानचा अश्‍व. ज्यावर चोपदार हातात झेंडा घेऊन बसलेला असतो. चोपदारांनी दंड उंचावून इशारा दिल्यावर या दोन अश्‍वांनी वेगाने धाव घेत दिंड्यांच्या पुढील टोकाला गेले आणि पुन्हा माऊलींच्या रथापर्यंत आले अन् पहिले उभे रिंगण पार पडले. रिंगणावेळी अग्रभागी व शेवटच्या टोकाच्या संपर्कासाठी चोपदारांनी वॉकी टॉकीचा वापर केला. चोपदारांनी चांदीचा राजदंड उंचावत रिंगण पार झाल्याचे जाहीर केले. दोन्ही अश्‍वांना चांदीच्या रथापुढे आल्यावर पेढ्यांचा प्रसाद भरवला गेला. अश्‍वांच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी एकच अलोट गर्दी उसळली होती. यावेळी परिसरात सुरू असलेला नामघोष आणि महिला-पुरुषांनीही बेभान होऊन घातलेल्या फुगड्या अणि फेराने येथे स्वर्ग सुखाचा सोहळाच सुरू झाला होता. अलोट उत्साहाने न्हालेले वारकरी रिंगण संपल्यावर तरडगावच्या मुक्कामासाठी सरसावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news