

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यात खरीप हंगामात खते व बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी 12 भरारी पथकांद्वारे आतापर्यंत खते, बि-बियाणे, औषधे अशा 1 हजार 10 दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. दुकानातील रेकॉर्ड व्यवस्थीत न ठेवल्याप्रकरणी 12 खते दुकाने व 2 किटकनाशक दुकानांचा विक्री परवाना निलंबीत करण्यात आला आहे. दरम्यान, 2 कोटीचे बियाणे जप्त करण्यात आले असून या बियाणांची तपासणी सुरू आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी, वजने मापे निरीक्षक, कृषि अधिकारी पंचायत तर जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी, कृषि उपसंचालक, मोहीम अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, वजने मापे निरीक्षकांचा पथकात समावेश राहणार आहे. ही 12 भरारी पथके कृषिशी निगडीत असणारी खते, बि-बियाणे, किटकनाशक दुकानांची तपासणी करणार असल्याची माहीती जि.प.चे कृषि विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली.
आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 10 खते- बियाणे व कृषि औषधांच्या दुकानांची तपासणी पथकांनी केली आहे. त्यामध्ये 108 बियाणांचे, 77 खतांचे व 39 किटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. बियाणांचे व किटकनाशकांचे नमुने शासकीय प्रयोगशाळा पुणे व खताचे नमुने शासकीय प्रयोगशाळा कोल्हापूर येथे पाठवण्यात आले होते. त्यापैकी बियाणांचे 7, खताचे 9 व किटकनाशकांचे 5 नमुने अप्रमाणीत असल्याचे आढळून आले आहेत. संबंधित कंपन्यांना व खत, बियाणे व किटकनाशक विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच बोगस बियाणे सातार्यात सापडले असून 1 हजार 22 क्विंटल बियाणे कृषि विभागाने जप्त केले आहे. त्यांची किंमत 2 कोटी 4 लाख 40 हजार रुपये आहे. जिल्ह्यातील 12 खत विक्रेते व 2 किटकनाशक विक्रेत्यांचा विक्री परवाना निलंबीत करण्यात आला आहे. तर एक परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला असल्याचे विजय माईनकर यांनी सांगितले.