सातारा : पुढारी वृत्तसेवा
रहिमतपूर ते कोरेगाव लोहमार्गावर अज्ञाताने सिमेंटचा पोल टाकल्याने कोल्हापूरकडे निघालेल्या कोयना एक्सप्रेसला अपघाताचा धोका निर्माण झाला होता. मात्र रेल्वे चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. याप्रकरणी रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरु आहे.
पुण्याकडून मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरकडे कोयना एक्सप्रेस निघाली होती. दरम्यान, रहिमतपूर ते कोरेगाव मार्गावरील रेल्वे रुळावर अज्ञाताने सिमेंटचे खांब टाकले होते. ही गोष्ट रेल्वे चालकाच्या निदर्शनास आल्यानंतर चालकाने रेल्वेच्या वेगावर तात्काळ नियंत्रण मिळवत रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे रेल्वेतील प्रवासी भयभीत झाले होते. तर काही प्रवाशांनी तर आपल्या कुटुंबियांना नातेवाईकांना या घटनेची माहिती दिल्यानंतर एकच गोंधळ उडाला.
याबाबत कोयना एक्सप्रेसच्या चालकांने या घटनेची माहिती तात्काळ रेल्वेच्या नियंत्रण कक्षासह रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिस, कोरेगाव व रहिमतपूर पोलिस ठाण्यांना दिली. त्यानंतर तात्काळ रेल्वे कर्मचार्यांसह पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक संभाजी काळे, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक सतवीर सिंग, सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटोळे, पोलिस हवालदार नितीन थोरात, रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिस, रहिमतपूर व कोरेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर रेल्वे लोहमार्गाचे काय नुकसान झाले आहे का? याची खातरजमा रेल्वेच्या यंत्रणेने केली. तसेच संबंधित रेल्वेसह इंजिनाचे नुकसान झाले आहे का? ते सुस्थितीत व लोहमार्गावरुन चालण्यासारखे आहे का? याची पाहणी केल्यानंतर काही वेळांनतर रेल्वे कोल्हापूरच्या दिशेने पुन्हा रवाना झाली. चालकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा बलाच्यावतीने या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, गेल्या महिन्यात लोणंद ते सालपे दरम्यान लोहमार्गावर अज्ञातांनी सिमेंटचे खांब टाकले होते. त्यामुळे पुणे व कोल्हापूरकडे धावणार्या रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी लोहमार्ग पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली होती. वारंवार लोहमार्गावर असे प्रकार होत असल्याने पोलिसांनीही आता या मार्गावर गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.