सातारा/बामणोली; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्याच्या पश्चिमेस पावसाची रिपरिप सुरु आहे. सातार्यास पाणीपुरवठा करणार्या कास धरणाची पाणीपातळी 27 फुटांवर पोहोचली आहे. कास धरणाने 25 फुटांची जुनी पाणीपातळी ओलांडली आहे. काही दिवसांतच कास धरणात 0.03 टीएमसी पाणीसाठा होईल, असा विश्वास नगरपालिका प्राशसनाने व्यक्त केला आहे.
सातारा शहराच्या प्रामुख्याने पश्चिम भागास कास धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्याशिवाय कास परिसरातील 15 गावांनाही कास धरणातूनच पाणीपुरवठा होतो. कास धरणाची पूर्वीची पाणीसाठवण क्षमता 0.01 टीएमसी होती. उरमोडी नदीवर असलेल्या या धरणात पावसाळ्यात प्रचंड पाणी वाहून जायचे आणि एप्रिल-मे महिन्यानंतर धरणाची पाणीपातळी झपाट्याने खालावलेली असायची. कास धरणाची पाणीसाठवण क्षमता 0.05 टीएमसी करण्यात आली आहे. पूर्वीच्या क्षमतेच्या पाचपट पाणीसाठा कास धरणात होणार आहे. यावर्षी कास धरणात 0.03 टीएमसी पाणीसाठा केला जाणार आहे.
कास धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चार-पाच दिवसांत मुसळधार पाऊस पडत आहे. परिसरातील ओढेनाले खळाळू लागले आहेत. त्यामुळे कास धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणाची पाणपातळी झपाट्याने वाढत आहे. गेल्या चार दिवसांत धरणाची पाणीपातळी तिप्पट झाली. पूर्वी 25 फूट पाणीसाठा झाल्यानंतर सांडव्यातून पाणी पडून धरण ओव्हर फ्लो व्हायचे. आता धरणाची उंची वाढवल्यामुळे अपेक्षित पाणीसाठा होण्यासाठी काही दिवस लागणार आहे. चार-आठ दिवसांत धरण भरेल, असा अंदाज नगरपालिका प्रशासनाचा आहे.कास धरण भरल्यानंतर पुढील वर्षीपासून पाणी कपातीची शक्यता राहणार नाही.