कराड : पुढारी वृत्तसेवा
कृषी संजीवनी मोहीम ज्या उद्देशाने कृषी विभाग राबवत आहे तो उद्देश सफल होताना दिसत आहे. शेतकर्यांना ही योजना मार्गदर्शक आणि फायदेशीर ठरत आहे, असे प्रतिपादन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले.
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या कृषी संजीवनी मोहिमेचा शुभारंभ कापील ता. कराड येथे झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर विभागाचे कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, कराडचे उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, कालवडे कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भरत खांडेकर, सेवा सोसायटीचे चेअरमन दुशंत पाटील, दिलीप गुरव, भरत पाटील, संजय जाधव, सुभाष पाटील, संभाजी पाटील, धन महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा सुनीता डाईंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषी पर्यवेक्षक अशोक कोळेकर यांनी भात व सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी सखोल मार्गदर्शन केले. डॉ. भरत खांडेकर यांनी जमीन सुपीकता निर्देशांक नुसार भात, सोयाबीन, ऊस, भुईमूग या प्रमुख पिकांच्या खत व्यवस्थापन करण्याविषयी मार्गदर्शन केले. सोयाबीन व भात या पिकांच्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत विनोद पुजारी यांनी टोकण यंत्र व भात, सोयाबीन बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सोयाबीन मिनी किटचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. विकास पाटील यांनी कृषी संजीवनी मोहिमेचे योग्य नियोजन केल्याबद्दल क्षेत्रीय कर्मचारी व अधिकारी यांचे अभिनंदन केले. बसवराज बिराजदार म्हणाले, शेतकर्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा.
यावेळी महिला शेतकरी गट, रिसोर्स बँक, शेतकरी व प्रगतशील शेतकरी यांचे अनुभव शेतकर्यांना फायदेशीर ठरत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. महिला शेती शाळा राबविणार्या कृषी सहाय्यक सारिका सरगर यांचा सत्कार विकास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
दिलीप जाधव, दत्तात्रय जाधव, दिलीप गुरव, कृषि मित्र गणपती शिर्के यांनी कृषी विभाग राबवित असलेल्या योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन मंडल कृषी अधिकारी सुशांत भोसले यांनी केले.आभार कृषी मित्र गणपती शिर्के यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक अशोक कोळेकर, विनोद पुजारी, कृषी सहाय्यक सारिका सरगर, मंगला साळुंखे, धनश्री होवाळ, संतोष काळे, वैभव नाळे यांनी परिश्रम घेतले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.