जिल्ह्याच्या पश्चिमेकडील महाबळेश्वर, वाई, जावली, सातारा, कराड,पाटण तालुक्यात रविवारी पुन्हा पावसाचा जोर वाढला. त्यामुळे कण्हेर धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला. दिवसभर जोरदार सरी कोसळल्या असून अनेक ठिकाणी रस्ते खचले, छोट्या-मोठ्या दरडी कोसळल्या. पुलांचेही नुकसान झाले. सातार्यात समर्थ मंदिर परिसरात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्यामुळे नुकसान झाले. दरम्यान, कोयना, वीर धरणातील विसर्ग अद्यापही कायम आहे.
जिल्ह्यात शुक्रवार व शनिवारी पावसाचा जोर ओसरला होता. मात्र रविवारी पहाटेपासून सातार्यासह विविध ठिकाणी पावसाचा पुन्हा जोर वाढला. पश्चिम भागातही धो धो पाऊस पडत असल्याने धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. या पावसाने अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या. परळी खोर्यात रेवंडे -वावदरे रस्ता खचला आहे. सातार्यात समर्थ मंदिर परिसरातील गणपती चौकात काही घरात पावसाचे पाणी शिरले. करंजे येथील शेंडे कॉलनीनजिक रस्त्याला भगदाड पडले. अजिंक्यतारा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ रविवारी सकाळी दरडी कोसळण्याचे प्रकार घडले. धोम डाव्या कालव्यावरील खानापूर ते शेंदूरजणे यांना जोडणार्या पुलाचा काही भाग कोसळल्याने पुलावरील वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली.
सातारा जिल्ह्यात रविवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा 8.8 मि.मी., जावली 26.5 मि.मी., पाटण 26.7 मि.मी., कराड 4.9 मि.मी.,कोरेगाव 1.8 मि.मी., खटाव 0.8 मि.मी., फलटण 0.7 मि.मी., खंडाळा 7.1 मि.मी., वाई 9.7मि.मी., महाबळेश्वर 35.2 मि.मी. पावसाची नोंद झाली.
कण्हेर धरणातील विसर्ग रविवारी वाढवण्यात आला. 7 हजार क्सुसेक विसर्ग वेण्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणातून पाणी सोडल्याने करंजे-म्हसवेला जोडणारा व हमदाबाज -किडगावला जोडणारा पुल पाण्याखाली गेला आहे. वीर धरणातून 4 हजार 637 क्युसेक विसर्ग निरा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.