

Satara flood evacuation
सातारा : कोयना धरणासह धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी व वीर या प्रमुख धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित निवारा शेड, हायस्कूल, शाळा, काहींना नातेवाईकांकडे तात्पुरते स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
यामध्ये पाटण तालुक्यात पाटण शहरात 13 कुटुंबातील 45 नागरिकांना, हेळवाक येथील 5 कुटुंबातील 17 नागरिकांना, नावडी, औंध वस्ती येथील 7 कुटुंबातील 15 नागरिकांना, कराड तालुक्यातील कराड शहर, पत्राचाळ, पाटण कॉलनी, कोयना दूध कॉलनी, रुक्मीणीनगर येथील 6 कुटुंबातील 24 नागरिकांना, महाबळेश्वर तालुक्यातील येर्णे बु. येथील 8 कुटुंबातील 18 नागरिकांना, वाई शहरातील 40 कुटुंबातील 135 नागरिकांना, सातारा तालुक्यातील भैरवगड येथील 30 कुटुंबातील 65 नागरिकांना, मोरेवाडी येथील 20 कुटुंबातील 42 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
पाटण तालुक्यात नेरळे पूल व मुळगाव पूल, पाबळनपाला रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कराड- हेळवाक रस्त्यावर पाणी आल्याने बंद., महाबळेश्वर तालुक्यातील देवसरे-मजरेवाडी रस्त्यावर पाणी आल्याने बंद करण्यात आला आहे. वाई तालुक्यातील कृष्णा नदीवरील हमदाबाज-किडगाव पूल, करंज-म्हसवे पूल, मौजे जिहे येथील जिहे-कठापूर रोडवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. खंडाळा तालुक्यातील नीरा नदीवरील लोणंद (वाठार)-वीर रस्ता व नीरा नदीवरील जून पाडेगाव येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. बंद रस्त्यांमुळे पर्यायी रस्ते उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.