

सातारा : साताऱ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वतंत्र क्रिकेट स्टेडियम उभारण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील क्रिकेट वर्तुळातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. आजी-माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक व पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाला पाठिंबा देत स्टेडियम लवकर उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
सातारा जिल्ह्यात, विशेषतः छोट्या शहरांसह ग्रामीण भागात अनेक गुणवंत व होतकरू क्रिकेटपटू आहेत. मात्र, मैदानाअभावी खेळाडूंना सराव तसेच स्पर्धांसाठी अडचणी येत आहेत. क्रिकेट स्पर्धांचे प्रमाण कमी झाले असले तरी खासगी क्लबच्या माध्यमातून स्पर्धा घेतल्या जात आहेत. जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा नियमित घेण्यासही मैदानाअभावी अडचणी येतात. त्यामुळे अनेक खेळाडू केवळ नेट सरावावर समाधान मानत आहेत.
महिला क्रिकेटमध्येही गेल्या काही वर्षांत वाढ झाली असून, अनेक मुलींनी राज्यस्तरावर लक्षवेधी कामगिरी केली आहे. अशा सर्व खेळाडूंना हक्काचे क्रिकेट मैदान उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र स्टेडियम महत्त्वाचे ठरणार आहे. सातारच्या दोन्ही राजांनी यासाठी पुढाकार घेतल्याने हा प्रश्न लवकर मार्गी लागेल, असा विश्वास आजी-माजी खेळाडूंनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केला. याशिवाय मिलिंद तळवलकर यांच्यासह अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी या निर्णयाचे स्वागत केले असून, स्टेडियम लवकरात लवकर उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.