

सातारा : विधिमंडळात एका प्रश्नावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत विरोधकांच्या दाव्यांना फेटाळून लावले.
‘साताऱ्यात सर्व आलबेल आहे. तुमच्या मनासारखे काहीही होणार नाही. आम्ही भाऊ-भाऊ एकत्र आहोत,’ असे ठाम विधान करत त्यांनी महायुतीतील मतभेदांच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. महायुतीतील समन्वय आणि स्थानिक पातळीवरील चर्चांच्या पार्श्वभूमीवर विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना फडणवीस यांनी हा टोला लगावला. सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून महायुतीच्या नेत्यांमध्ये रणकंदन झाले होते. त्यानंतर फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एकत्र बसून महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता.
या पार्श्वभूमीवर विधिमंडळात विरोधकांनी महायुतीतील नेत्यांमधील बेबनाव अजून दूर झाला नसल्याचे खोचक विधान केले. त्याला प्रत्युत्तर देताना ना. फडणवीस यांनी महायुतीमधील साताऱ्याच्या नेत्यांमध्ये कुठलाही बेबनाव नसल्याचे स्पष्ट केले.