सातारा : पावसाळ्याच्या तोंडावरही 11 टँकर सुरू

सातारा : पावसाळ्याच्या तोंडावरही 11 टँकर सुरू

सातारा : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात तीव्र उन्हाळा असल्याने पाणी स्त्रोत कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून माण, वाई, पाटण, जावली, सातारा, कराड या तालुक्यातील 15 गावे व 37 वाड्यांमधील 17 हजार 103 नागरिक व 5 हजार 92 जनावरे तहानलेली असून सुमारे 11 टँकरने पाणी पुरवठा प्रशासनामार्फत केला जात आहे.

मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात कडक उन्हाळा सुरु झाला आहे. मात्र जलसंधारणाची कामे प्रशासनामार्फत माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा यासह अन्य तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे जमिनीमधील भूजल पातळीही स्थिर आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात एकही टँकर सुरु नव्हता. मात्र दुसर्‍या आठवड्यापासून विविध गावातून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी आली. त्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत त्या-त्या गावाचा सर्व्हे करण्यात आला. त्यानंतर संबंधित गावांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत टँकर सुरु करण्यात आले.

माण तालुक्यातील पाचवड गावठाण शिंगाडेवस्ती, गेंदवाडा, पांगरी गावठाण, स्टँड परिसर, मुलाणी वस्ती, खरातवस्ती, पंदरकी, लांडगोबा, मोरदरा, लक्ष्मीनगर, तपासेवस्ती, जाधववस्ती, वाघाडी, लोखंडेवस्ती, चाफेमळा, धुळाची मळवी, गडदेवस्ती, बिजवडी गावठाण, वारुगड, मठवस्ती, खंड्याचीवाडी, गावदरा, उगळेवाडे अशी मिळून 5 गावे व 26 वाडी वस्त्यामधील 5 हजार 708 नागरिकांना 2 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. वाई तालुक्यातील मांढरदेव, गडगेवाडी, बालेघर अंतर्गत अनपटवाडी, कासुर्डेवाडी, गुंडेवाडी असे मिळून 3 गावे व 2 वाड्यांना येथील 3 हजार 572 नागरिक व 1 हजार 831 जनावरांसाठी 2 टँकर मंजूर करण्यात आले आहेत.

सातारा तालुक्यातील जांभगाव, आवाडवाडी, निकमवाडी येथील 2 गावे 2 वाड्यामधील 1 हजार 354 नागरिक व 340 जनावरांना 2 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कराड तालुक्यातील वानरवाडी, बामणवाडी गावामधील 2 हजार 178 नागरिक व 976 जनावरांना 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

पाटण तालुक्यातील जंगलवाडी, जाधववाडी, चव्हाणवाडी, फडतरवाडी, घोट, आंब्रुळकरवाडी, भोसगाव या 4 वाड्यामधील 1 हजार 759 नागरिक व 843 जनावरांना एका टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जावली तालुक्यात खिलारमुरा, आखवडी मुरा, वारणेवस्ती, गवडी, म्हाते बु., भोगवली तर्फ मेढा येथील 2 हजार 532 नागरिक व 1 हजार 102 जनावरांना 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे यांनी दिली. दरम्यान, कडक उन्हाळा असला तरी माण व खटाव तालुक्यातील भूजल पातळी समाधानकारक आहे.

जिल्ह्यातील 34 विहीरी अधिग्रहीत…

टँकर भरण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने पिंगळी बु., शिंदी खु, वाई, शिंदेवाडी, जिंती, खामगाव, कापडगाव, वाखरी, कोरेगाव, रेवलकरवाडी, नवलेवाडी, मांजरवाडी, डिस्कळ, निढळ, खटाव, संजयनगर शेरे, सह्याद्रीनगर, जवळेवाडी, मोरावळे, खामकरवाडी, तेटली या ठिकाणी विहीरी व विधंन विहीरी अधिग्रहीत केल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news