

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांची मंगळवारी सातार्यातून बदली झाल्याची ऑर्डर आल्यानंतर अवघ्या तीनच तासांत वरिष्ठ पातळीवर घडामोडी होत त्यांची बदली थांबली. सातारा पोलिस दलातील ही पहिलीच घटना असून महाराष्ट्र पोलिस दलातील देखील दुर्मीळ घटना आहे. यामुळे शेख यांचेही वजन दिसून आले असून चांगले काम करणार्या अधिकार्यांबाबत टर्म पूर्ण होण्याआधीच उचला उचलीच्या घटना होऊ नयेत, अशी भावना सातारकरांमध्ये उमटली आहे.
एसपी समीर शेख नोव्हेंबर 2022 मध्ये गडचिरोली येथून सातार्यात रुजू झाले. अवघ्या पाऊणेदोन वर्षात अनेक कामगिरीची घोडदौड सुरु केली. कायदा व सुव्यवस्था राखत पोलिस दलाच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या आयडिया त्यांनी राबवल्या. यामध्ये प्रामुख्याने प्रतापगड येथील अफजलखान कबरीलगतच्या अतिक्रमणावर हातोडा त्यांनी मारला. पहिल्याच आठवड्यात असा षटकार मारल्यानंतर पुढेही त्यांनी घरफोड्या करणार्यांना जेरबंद करुन सर्वसामान्य नागरिकांचे सुमारे 4 किलो सोने त्यांनी मिळवून दिले. गुंडा-पुंडांचाही बंदोबस्त करत संघटीत गुन्हेगारी (मोका), तडीपारी, एमपीडीए याचा धडाका ठेवला. प्रतापसिंह नगरातील गुन्हेगारांच्या बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर फिरवला. सातारा जिल्ह्यातील तरुण होतकरुन युवक भरकटू नये, त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी हजारो युवकांना-युवतींना उंच भरारी या प्रकल्पाद्वारे काम मिळवून दिले. एसपी समीर शेख यांच्या कालावधीत लोकसभेची निवडणूक देखील शांततेत पार पडली.
एसपी समीर शेख यांचा अद्याप कालावाधी पूर्ण झालेला नसतानाच मंगळवारी रात्री अचानक त्यांची बदली झाल्याचे समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सर्वसामान्य नागरिकांमध्ये या बदलीबाबत चीड निर्माण झाली. यानंतर मात्र एसपी समीर शेख हे धीरोदात्तपणे सामोरे गेले. प्रशासनातील सर्व अनुभव त्यांनी पणाला लावला. तीन तासांमध्ये अनेक घडामोडी झाल्यानंतर गृह विभागाची आणखी एक ऑर्डर आली आणि एसपी समीर शेख यांची बदली थांबली. ही बातमी सातारा जिल्ह्यात वार्यासारखी फिरल्यानंतर त्याचे सातारकरांनी स्वागत केले. प्रामाणिक व सच्च्या अधिकार्याला न्याय मिळाला, अशी भावना निर्माण झाली.
दुसरीकडे गृह विभागाचा व राज्यकर्त्यांचा सुरु असलेला भोंगळ कारभार देखील समोर आला. अवघ्या तीन तासांत सातारच्या पोलिस अधीक्षकांची बदली थांबवावी लागली. आयएएस अधिकार्यांच्या बाबतीत अशा ऑर्डर होतात. मात्र पोलिस अधिकार्यांच्या बाबतीत एकदा ऑर्डर झाली की पुन्हा लगेच थांबली असे होतच नाही. मंगळवारी मात्र सातारचे एसपी समीर शेख यांच्या बाबतीत असे घडले. त्यातून समीर शेख यांची कारकीर्दही उजाळून निघाली.
गेल्या काही वर्षांमध्ये सातारच्या प्रशासनामध्ये भलतेच घडू लागले आहे. महसूल, जिल्हा परिषद व पोलिस प्रशासनामध्ये अधिकार्यांचा कार्यकाल पूर्ण न होताच त्यांची बदली करण्याचे प्रमाण वाढले आहे. वशिलेबाजांकडून ‘टेंडर’ प्रक्रिया जोमाने होत असल्याने त्याचे पडसाद हळूहळू उमटू लागले आहे. अधिकारी सेटल होण्यापूर्वीच त्याची उचलबांगडी झाल्यास जिल्ह्याच्या विकासावर त्याचा परिणाम होणार आहे. चार वर्षांत तीन कलेक्टर, तीन एसपी, तीन झेडपी सीईओ, तीन अॅडिशनल एसपी बदलले जात असतील तर ‘ये पब्लिक है... सब जानती है’ असेच म्हणावे लागणार आहे.