

सातारा : 1911 सालच्या आकडेवारीनुसार खंड घेणारे, म्हणजे जमीनदार असलेले ‘मराठा’ (कुणबी) फक्त 1.7 टक्के होते. स्वतः राबून शेती करणारे 63.8 टक्क्के होते तर शेतमजुरी करणारे 22.7 टक्के होते. आज यापैकी बहुसंख्य ओझी उचलण्याची कामे औद्योगिक शहरात आणि रेल्वेत करतात. या विभागात कुणबी (मराठा) आणि घनगर या जातीशिवाय दसरी जात अपवादानेच सापडते. ज्याप्रमाणे सफाई कामगार आणि कागद-काच-पत्रा वेचणार्यांमध्ये शंभर टक्के पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातीच आजही सापडत असल्याची माहिती धरणग्रस्तांचे नेते, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष व मराठा आरक्षण लढ्यातील अभ्यासक डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
डॉ. पाटणकर यांनी दै. पुढारीशी बोलताना मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा म्हणजेच कुणबी असल्याची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. ते म्हणतात,‘मराठा क्रांती मूक मोर्चामध्ये बोलणार्या मुलीच्या भाषणात वाडा असलेला शंभर एकर जमिनीचा मालक, वारसदारात जमीन विभागली गेल्यामुळे अल्पभूधारक बनला’ अशा आशयाची वाक्ये जवळ जवळ सर्वच मोर्चामध्ये होती. पण आपण नमूद केलेल्या ठोस माहितीतून असे दिसते की, 1881 च्या जनगणनेतली आकडेवारी सुद्धा यापेक्षा फार जमीनदार ‘मराठा’ (कुणबी) फक्त 1 ते 2 टक्केच असल्याचे 1911 सालच्या आकडेवारीपेक्षा वेगळी नाही. आजही साधारणपणे हेच चित्र आपल्याला दिसते. गेली सुमारे 140 वर्षे बहुसंख्य (म्हणजे 95 टक्केपेक्षा जास्त) मराठा (कुणबी) जातीच्या लोकांची परिस्थिती गरिबीची कष्टप्रद आणि हलाखीच्या जीवनाचीच आहे. खरे म्हणजे तथाकथित विकासाच्या परिणामांमुळे त्यांचा विकास होण्याऐवजी त्यांची स्थिती जास्तच भकास झाली आहे. कर्जबाजारीपणा आणि प्रकल्पांसाठी होणारे जमिनींचे संपादन याचा हा परिणाम आहे. आजच्या साम्राज्यवादी जागतिकीकरणाच्या काळात या प्रक्रियेने जास्तच वेग घेतला असल्याचे डॉ. पाटणकर यांनी नमूद केले आहे.
ते म्हणाले, मराठा (कुणबी) जातीची ही स्थिती इतर शोषित जातींप्रमाणेच ‘जात’ म्हणून असलेल्या तिच्या स्थानामुळे झाली आहे. खरे म्हणजे ‘कुणबावा’ करणे (म्हणजेच शेतीत राबून उत्पादन करणे) हेच काम जातिव्यवस्थेने कुणब्यांवर लादले होते. जसे अन्य जातींवर सुतार काम, लोहार काम, कुंभारकाम इत्यादी कामे लादली होती. कुणबी जात ही जातीय उतरंडीमध्ये पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जाती आणि अंशतः अस्पृश्य असलेल्या सुतार, कुंभार, लोहार, परीट अशा जातींपेक्षा वरच्या बाजूला असली तरी ती शोषित जातच होती आणि आहे हे ध्यानात घेतले पाहिजे.
डॉ. पाटणकर म्हणाले, जात म्हणून मराठा (कुणबी) ही कष्ट करणारी, राजे आणि जमीनदार व ब्राह्मण यांच्या शोषणाचा बळी असलेलीच जात आहे, हे मराठा म्हणवणार्या लोकांनी स्वीकारले पाहिजे. खोट्या, पोकळ उपाध्या आणि बडेजावाच्या भ्रामक जाणीवेतून त्यांनी बाहेर आले पाहिजे. सत्य स्वीकारून वास्तव जीवनातल्या शोषणाचा मुकाबला करायला सिद्ध झाले पाहिजे. ‘बामणाला लिवणं-कुणब्याला दाणं आणि म्हारा मांगाला गाणं’ ही म्हण 50-60 वर्षांपूर्वीपर्यंत प्रचलित होती. या म्हणीतले कुणबी म्हणजेच ‘मराठा’ उपाधी लावलेले आजचे लोक आहेत. ते आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणा भोगत आलेले आणि भोगत असलेले आहेत. हेच वास्तव आहे. स्वतःला ‘सरकार’, ‘राजे’, ‘महाराज’ म्हणवून घेणार्या जमीनदार मराठ्यांसारखे समजण्याचा भ्रामक सोस त्यांनी त्यागला पाहिजे. साखर सम्राट, सत्ता सम्राट आणि शिक्षण सम्राट असलेल्या मूठभर मराठ्यांनी त्यांना उद्ध्वस्त केले आहे आणि आजही करत आहेत, याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे.
आज मराठा म्हणवून घेणार्या या शोषित कुणब्यांनी त्यांच्यातल्या या दांडग्यांना खड्यासारखे उचलून बाजूला काढले पाहिजे. स्वतःची स्वाभिमानी ओळख मिरवताना त्यांनी म्हटले पाहिजे की, आम्ही कुणबी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. कारण आम्ही अन्न-धान्य पिकवणारे उत्पादक निर्माते आहोत. आम्ही स्वतःच्या कष्टावर स्वाभिमानाने जगणारे आहोत. दुसर्यांना राबायला लावून स्वतः आयते खाणार्या जमीनदार-भांडवलदारांसारखे आम्ही शोषक नाही, याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही आता जात, वर्ग आणि लिंग यावर आधारित शोषण संपवण्यासाठी सर्व शोषित जातींच्या एकजुटीने संघर्ष करणार आहोत. अशी सत्यावर आधारलेली स्वाभिमानी पण नम्र भूमिका घेतली पाहिजे, असे डॉ. पाटणकर म्हणाले.
मराठा म्हणवून घेणार्या कुणबी जातीच्या लोकांनी स्वतःची दुःखे, उद्ध्वस्तता आणि शोषण संपवण्यासाठी सिद्ध होण्याची गरज आहे. नाहीतर गद्दार साखर सम्राट, सत्ता सम्राट आणि शिक्षण सम्राट यांचे गुलाम म्हणून किंवा ताटाखालचे मांजर म्हणून त्यांना लाचारीचे जीवन पुढेही जगावे लागेल. असे असूनही विद्वान लोक म्हणत राहतील की ‘कोणत्याही पार्टीचे सरकार असो सत्ता मराठ्यांच्या हातात आहे’ पण प्रत्यक्षात मात्र मराठे म्हणवून घेणारे कुणबी ओझी उचलण्याचे, शेतात अंग मेहनती काम करण्याचे, हमाली करण्याचेच काम करत असतील. त्यांची मते घेऊन आणि त्यांच्या डोक्यावर पाय ठेवून वर चढलेले हे सम्राट मराठे मात्र आनंदात सत्ता भोगत राहतील, असे चित्र डॉ. पाटणकर यांनी मांडले आहे.