

Koyna Dam water level
सातारा : साई सावंत
राज्यासह सातारा जिल्ह्यात देखील उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम धरणांच्या पाणी पातळीवर देखील होऊ लागला आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाचे शिवसागर जलाशय हळूहळू आटण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जलाशयातील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने या भागातील पर्यटनावर देखील त्याचा परिणाम झाला आहे. 105 टीएमसी क्षमतेच्या या धरणात सध्या फक्त 26 टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणाच्या जलाशयाचे पात्र उघडे पडल्याने या धरणात बुडालेली जुनी मंदिरे, बाजारपेठा यांचे अवशेष दिसू लागले आहेत. पावसाळ्याला अजून एक महिना बाकी असल्याने काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सोमवारी पुन्हा एकदा राज्यात धगधगता अग्निकुंड पेटल्याप्रमाणे उकाडा जाणवत होता. दिवसभर अंगाची लाहीलाही होऊन नागरिक उन्हात अक्षरशः भाजून निघाले. हवामान विभागाने राज्यात 'हीट डिस्कम्फर्ट' जाहीर केला असून, सावधानतेचा इशारा दिला आहे. किमान कमाल तापमानात अवघ्या १० ते १३ अंशांचे अंतर उरल्याने अहोरात्र उकाडा जाणवत आहे. त्यामुळे पंखे, कुलरही शरीराला गारवा देण्यात कमी पडत आहेत.
राज्यातील हवामानात गत २४ ते ७२ तासांत मोठे बदल झाले असून, वातावरण पूर्ण शुष्क कोरडे झाल्याने सूर्याची किरणे थेट राज्यात तीव्रतेने पडत आहेत, त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात अवघे १० ते १३ अंशांचे अंतर राहिले आहे. जणू दिवस-रात्रीचे तापमान एकच झाल्यासारखी स्थिती असल्याने राज्यात उकाडा जाणवत आहे. सोमवारी अवघा महाराष्ट्र होरपळून गेला. नागरिक उष्णतेत भाजून निघाले. त्यामुळे हवामान विभागाने राज्यात अस्वस्थ करणारे वातावरण, असा इशारा देत बाहेर पडताना सावध राहा. घरातही थंड वातावरणात राहा, असा सल्ला दिला आहे.